प्रतिनिधी/ बेळगाव
कल्लेहोळ गावातील रेशन दुकानदार व्यवस्थीत रेशन वितरण करत नसल्यामुळे रेशनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तेंव्हा रेशन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कल्लेहोळ येथील ग्रामस्थांनी अन्न आणि नागरी पुरवठय़ाच्या जिल्हा उपसंचालकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
रेशन देताना 500 ते 800 ग्रॅम रेशन कमी देण्यात येत आहे. रेशन आल्यानंतर ते सरकारी इमारतीत न ठेवता खासगी इमारतीत ठेवण्यात आले आहे. वृद्ध लोकांचा अंगठा लागत नाही. असे सांगून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. रेशन वेळेत वाटप करण्यात येत नाही. त्यांचे वैयक्तिक काम राहिले की रेशन वितरण अर्धवट देण्यात येत आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला.
रेशन वितरण केवळ तीन दिवसच करणार, असे सांगून रेशन धारकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खाली पडलेले धान्य पुन्हा ते गोळा करून विक्री करण्यात येत आहे. तेंव्हा याबाबत रेशन दुकानदाराला योग्य त्या सूचना देऊन रेशन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या निवेनात करण्यात आली. या निवेदनावर गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱया आहेत.