कळंबा / सागर पाटील
करवीर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारी कळंबा पोलीस चौकी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. शहरालगत राजकीय संवेदनशील असणाऱ्या कळंबा पोलीस चोकी बंद असल्यामुळे परिसरात भुरट्या चोऱ्यांसह अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना किरकोळ कारणासाठी करवीर पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान, पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी कळंबा ग्रामस्थांकडून होत आहे.
कळंबा गावची लोकसंख्या १० हजार च्या आसपास आहे . शहरालगत असल्याने कळंबा गाव संवेदनशील व राजकीयदृष्टया महत्वाचे आहे . कोल्हापुर गारगोटी मुख्य मार्गावर चौकी असल्याने नागरिकांनातत्काळ मदतीकरीता चौकी सुरु असणे गरजेचे बनले आहे . तसेच चौकी बंद असल्याने गावातील किरकोळ वाद चोकीत मिटत होते . परंतु आता चौकी बंद असल्याने किरकोळ कारणाकरीता नागरिकांना करवीर पोलीस स्टेशनला जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून त्यांचा वेळ जात आहे . गावची लोकसंख्या पाहता आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौकी चालू करणे गरजेचे आहे. कळंबा तलावावर आजूबाजूच्या परिसरातील मद्यपींचा वावर वाढला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ही चीकी कायमस्वरुपी सुरू राहणे गरजेचे आहे. कळंबा परिसरातील चौकी चालू होती तेव्हा गुन्हेगारीला प्रतिबंध बसून अवैध धंदे बंद होण्यास मदत झाली होती. पोलिसांची जरब अवैध व्यावसायिकांबर बसली होती . सध्या चौकी बंद असल्यामुळे वाहनातील पेट्रोलची चोरी तसेच छोट्या – मोठ्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे अशातच पहाटे वर्दळ कमी असल्याने उप नगरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मार्निग वॉकला जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र व दागिने हिसकावून घेण्याचे व चेन स्नेचिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . तरी चौकी लवकरात लवकर चालू करावी , अशी मागणी होत आहे.