संतप्त जमावाने रिक्षा पेटवली
प्रतिनिधी/ सातारा
कळंबे (ता. सातारा) येथे आजी आजोबासह दोन नातवांना ऍपे रिक्षाने ठोकरल्याने दीड वर्षाच्या नातीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आजी व नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने मद्यधुंद रिक्षा चालकाला अडवून बेदम मार दिला आहे. या घटनेतील ऍपे रिक्षात उसाची पाचट टाकून संतप्त झालेल्या युवकांनी रिक्षा पेटवली. या घटनेने गावातील वातावरण तंग झाले होते. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
या घटनेत अनवी विकास इंदलकर (वय दीड वर्ष) या एकुलत्या एक चिमुकलीला ठोकरल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात श्रावण मदन इंदलकर (वय साडेतीन वर्षे) व आजी रुक्मिणी कृष्णा इंदलकर (वय 58 वर्षे, सर्व रा. कळंबे) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर चालक प्राण काशिनाथ पवार (वय 28, रा. आकले) या चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कळंबे येथील भैरवनाथाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. यात्रेनिमित्त भैरवनाथाचे मंदिराबाहेरूनच देवाचे दर्शन घेऊन आजी-आजोबा आपल्या नातवांसह मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास घरी परतत होते. याच दरम्यान मागून आलेल्या मालवाहतूक ऍपे क्र. एम एच- 11 बी एल 0623 या गाडीने पादचाऱयांना मद्यधुंद अवस्थेत ठोकरले. अपघात करून चालकाने पलायन केले असता तेथील युवकांनी पाठलाग करून चालकास अडवले. संबंधित घटनेच्या ठिकाणी आणून चालकाला युवकांनी बेदम मारहाण केली. ऍपेमध्ये उसाची पाचट टाकून संतप्त झालेल्या युवकांनी ऍपेरिक्षा पेटवली.
या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी तालुका पोलिसांना दिली. घटनास्थळी रात्रीच पोलीस दाखल झाले आणि मग या घटनेवर नियंत्रण मिळवले. संबंधित गाडी चालकास चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू मुलाणी, कॉन्स्टेबल पाटोळे अधिक तपास करत आहेत.