कोल्हापूर / प्रतिनिधी
कळंबा ग्रामस्थांनी रविवारी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत येण्यास प्रखर विरोध केला. हद्दवाढ समन्वय व कृती समितीच्या बैठकीत त्यांनी हद्दवाढीला विरोध असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या हद्दवाढीच्या विरोधात तीव्र भावना आहे. प्रथम शहराचा विकास करा आणि मग हद्दवाढीसाठी या अशी भूमीका कळंबा ग्रामस्थानाच्या वतीने सरपंच सागर भोगम यांनी मांडली.
कोल्हापूर शहराची हद्दवाढीसाठी हद्दवाढ समन्वय व कृती समितीने नव्याने लढा पुकारला आहे. पहिला टप्पा म्हणून रविवारी कळंबा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांसोबत हद्दवाढीसंदर्भात बैठक घेतली. कळंबा येथील हुनमान मंदिरातील सभागृहात बैठक झाली.
कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार यांनी हद्दवाढीत येण्यासाठी कळंबा ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. कृती समितीचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी जिल्हय़ाच्या विकासासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ का आवश्यक आहे, याची माहिती दिली. ते म्हणाले, हद्दवाढीतून जिल्हय़ाचा विकास व्हावा हे एकमेव उद्दिष्टे आहे. कोणाचे हक्क हिसकावून घेणे हा हद्दवाढी मागचा हेतू नाही. विकास दरात राज्यात दुसऱया क्रमांकावर असणारा आता जिल्हा आठव्या क्रमांकावर गेला आहे. जिल्हय़ात उद्योग व्यवसाय पुरेसा प्रमाणात विकसीत झाले नाहीत. त्यामुळे येथील मुले चांगले शिकूनही नोकरीसाठी आपल्यापासून दूर पुण्या-मुंबईला जावे लागत आहे. कर वाढावा, मनपाचे उत्पन्न वाढावे यासाठी हद्दवाढ नको आहे. शहराचा विकास झाला तरच जिल्हय़ाचा विकास होणार आहे. यासाठी हद्दवाढीची मागणी करत आहे.
सरपंच सागर भोगम म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थाना सर्व सुविधा दिल्या जातात. कोरोनामध्ये कोल्हापूर शहरासह उपनगरातील मृतदेह कळंबा स्मशानभूमीत दहन केले. प्राधिकरणामध्ये चांगली कामे होत आहेत. ग्रामस्थांचा हद्दवाढीला विरोध आहे. प्रथम कोल्हापूर शहराचा विकास करावा आणि मग हद्दवाढीसाठी विचार करू. कळंबा ग्रामपंचायतीचे गटनेता उदय जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन हद्दवाढ समिती सदस्यांचे स्वागत केले. यावेळी बाबा पार्टे, माजी महापौर सुनील कदम, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदिप गायकवाड, माजी नगरसेवक अनिल कदम, अशोक भंडारे, महेश उत्तुरे, किशोर घाटगे, कळंबा उपसरपंच अरूण टोपकर, बाजीराव पोवार, दिलीप पाटील, रंगराव तिवले, राजू तिवले, संग्राम जाधव, प्रकाश टोपकर, सुधीर पाटील, नितीन देसाई, रोहित मिरजे, विजय खानविलकर आदी उपस्थित होते.