दोडामार्ग – वार्ताहर-
येत्या 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी कळणे येथे होणाऱ्या मायनींग विरोधातील शेतकरी ग्रामस्थ यांच्या उपोषण आंदोलनाला दोडामार्ग तालुका भाजप युवामोर्चा तर्फे पाठींबा देण्यात आला आहे. पक्षीय मतभेद विसरून आपण पाठींबा देत असल्याचे युवमोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात कळणे मायनिंग मधील पाण्याचा बांध फुटून परिसरातील शेती बागायती व घरांमध्ये पाणी घुसले. त्यात कळणेमधील असंख्य शेतकरी ग्रामस्थ यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाकडून योग्य भरपाई न मिळाल्याच्या कारणास्तव स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी मायनींग क्षेत्रात पाणी – चिखलात कळणेवासीय उपोषण छेडणार आहेत. या उपोषणाला तालुका भाजप युवमोर्चाच्या वतीने आम्ही पाठींबा देत आहोत. कळणे मधील शेतीबागायतीचे व घरांचे वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन त्या सर्वांना योग्य ती नुकसान भरपाई शासनाने द्यायला हवी होती. परंतु अद्याप पर्यन्त कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे कळणेवासीय उपोषणास बसत आहेत. वास्तविक पाहता स्थानिक आमदार व खासदार यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून ते आज पर्यंत शासन स्तरावरून भरपाई मिळून द्यायला हवी होती परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही. कळणेवासीयांच्या जनमताचा अनादर आमदार, खासदारांसोबत त्यांच्या अन्य लोकप्रतिनिधींनीही केला आहे. आमदार खासदार आले व पाहणी करून गेले भरपाईची नुसत्या वलग्नाच केल्या. हे स्थानिक जनता कधीही विसरणार नाही कळणे मधील नुकसान ग्रस्त शेतकरी – ग्रामस्थ यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत असे दीपक गवस यांनी स्पष्ट केले.