लाल मातीचे लोळ घरे, बागायतीत : सुमारे तीस घरांना फटका : ‘अधिकारी हो, हे सर्व तुमच्याचमुळे!’
मायनिंग कंपनीवर गुन्हा दाखल
करण्याची ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर / दोडामार्ग:
काही वर्षांपूर्वी राज्यभरात गाजलेल्या कळणे येथील मायनिंगमधील पाणी अडविणारा बांध गुरुवारी सकाळी फुटल्याने परिसरात एकच घबराट पसरली. या मायनिंग क्षेत्रातील लाल मातीमिश्रीत पाण्याचे लोट परिसरातील घरांत शिरले. लगतच्या शेती-बागायतीतही घुसले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ग्रामस्थ व शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच प्रशासनातील अन्य अधिकाऱयांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदर मायनिंगशी निगडीत कंपनीवर गुन्हा दाखल करा अन्यथा वेगळा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, सदर मायनिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांनी मान्य केली.
कळणे मायनिंगमध्ये खनिज पावसाने वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या साठय़ाद्वारे ते ठेवले जाते. यासाठी सभोवताली मायनिंग प्रशासनाने उभारलेला बांध गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फुटला. यावेळी झालेल्या आवाजाने कळणे व आसपासचा परिसर हादरला. मायनिंगमधील लालमाती मिश्रीत पाणी लगतच्या शेती-बागायतीमध्ये तसेच घरांमध्ये घुसले. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी एकमेकांच्या सहकार्याने सुरक्षित जागेत स्थलांतर केले. या मातीमिश्रीत पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की, घरे तसेच शेती बागायतीचा परिसर चिखलाने भरून गेला. एवढेच नव्हे, तर कळणे ते उगाडे या मार्गावर माती व पाणी आल्याने हा मार्ग पूर्णतः बंद झाला.
घटनेची माहिती मिळताच अधिकाऱयांची घटनास्थळी धाव
कळणेतील या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ सहकारी कर्मचाऱयांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. सदस्य संपदा देसाई, गणपत देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, मिलिंद नाईक, पं. स. सदस्य धनश्री गवस, गणेशप्रसाद गवस, संजय विर्नोडकर आदींनी आसपासच्या लोकांना अन्यत्र हलवण्यास सुरुवात केली. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरसह दोन रुग्णवाहिकाही तात्काळ हजर झाल्या.
जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांवर प्रश्नांचा भडिमार
मायनिंग क्षेत्रातील बांध फुटून सर्वत्र पसरलेले पाणी व नुकसान पाहताच ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. तहसीलदार खानोलकर यांनी तातडीने ओरोस येथे फोनवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर साधारणत: 11.30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी दोडामार्गातील तहसीलदार कार्यालयात आपण येतो, असे सांगताच ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. तेव्हा खानोलकर यांनी पाटील यांना ओरोसहून थेट घटनास्थळी येण्यास सांगितले. पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी बोलण्यास वळले. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित केले जातील. तसेच तुम्हाला तातडीने भरपाई दिली जाईल, असे पाटील यांनी सांगतात ग्रामस्थ पुन्हा संतापले. तुमची मदत आम्हाला नको व तुमच्याकडून सांत्वन तर नकोच नको. तुम्ही मायनिंग कंपनीचे दलाल आहात. तुमच्यासारख्या अधिकाऱयांमुळेच अशा घटना घडतात. मायनिंग क्षेत्राच्या पाहणीच्या नावाखाली तुम्ही मायनिंग कंपनीकडून ‘पाकिटे’ घ्यायला येता, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तेव्हा पाटील अक्षरश: निरुत्तर झाले. संबंधित मायनिंग कंपनीवर आजच्या या घटनेच्या अनुषंगाने हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यासाठी मी आग्रही राहीन, असे त्यांनी सांगताच वातावरण काहीसे निवळले. तर आमदार दीपक केसरकर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील आजपासून तीन दिवस दोडामार्ग सोडू नका, असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांना दिले.
खासदार विनायक राऊत आज करणार पाहणी
केवळ लोकांचे समाधान व्हावे म्हणून खोटी आश्वासने देऊ नका. जसे बोलता, तसे वागून दाखवा. संबंधित मायनिंग कंपनीवर गुन्हे दाखल करा. अन्यथा तुम्हाला शिक्षा होण्यासाठी ग्रामस्थांसह आम्ही ठिय्या आंदोलन छेडू व त्यावेळी आम्ही सत्ताधारी आहोत, हे देखील आम्हाला विसरावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला. खासदार विनायक राऊत शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार असल्याचे धुरी यांनी ग्रामस्थांना सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती गोवा येथील केंद्र शासनाच्या माईन सेफ्टी विभागाला कळविण्यात आली असून ते लवकरच या ठिकाणी येऊन या मायनिंगची पाहणी करणार आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.
सुमारे तीस घरे, शेती-बागायतीचे नुकसान
या घटनेत धवडकी व धनगरवाडी या दोन्ही वाडय़ातील एकूण 25 ते 30 घरांना फटका बसला. या घरांमध्ये मातीयुक्त पाणी शिरल्याने घराघरात घाण झाली. तसेच काही घरातील अन्नधान्याशिवाय इतर सामग्री देखील या पाण्यामुळे प्रभावित झाल्या. तसेच शेती-बागायतीमध्ये हे पाणी घुसून त्या ठिकाणी दलदलीचे साम्राज्य झाले. अनेक आंबा, काजू कलमे, नारळ, सुपारी, नाचणी, भात व इतर पिकांची मोठी हानी झाली. तसेच गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे.
पाण्याच्या लोंढय़ाचा आवाज अक्षरश: स्फोटासारखा – प्रमोद ठुंबरे
मायनिंग प्रवण क्षेत्रात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अक्षरश: एखाद्या स्फोटासारखा आवाज झाला व मी हादरलो. नेमके कुठे काय झाले? हेच मला कळेना. कानोसा घेतला असता माझ्या घराच्या परिसरात मातीमिश्रीत पाणी येत असल्याचे दिसले. त्यानंतर मी लगेच माझे आई-वडील, पत्नी, मुलांना तातडीने घराबाहेर काढले तसेच अंगणातील कार, दुचाकी सुद्धा अन्यत्र हलविली, असे प्रमोद ठुंबरे यांनी सांगितले.
अपर्णा परब यांना फुटले रडू
संपूर्ण कुटुंबाची उपजीविका असणाऱया शेती-बागायतीमध्ये पाणी घुसून मोठी हानी झाल्याचे पाहताच अपर्णा अर्जुन परब यांना रडूच कोसळले. पोटच्या पोराप्रमाणे उभी केलेली शेती, भात, नाचणी पाण्याने व चिखलाने भरल्याने आता आम्ही खायचे तरी काय ? असा हतबल सवाल त्यांनी केला.
रणजीत सिंह धारिवालचे नशीब बलवत्तर!
घटनास्थळी परिसरातील रणजीत सिंह धारिवाल हे घरात होते. त्यांच्या घराबाहेरील उंच कठडय़ापर्यंत पाणी व माती पोहोचली, तरी त्याची अजिबात कल्पना त्यांना नव्हती. मात्र, बचावकार्य करीत असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरड करून त्यांना सांगितले. घरातील पाळीव कुत्र्यासह धारिवाल यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली अन्यथा घराभोवती वेढलेल्या पाण्यात ते अडकून पडले असते.