दोडामार्ग / वार्ताहर:
कळणे मायनींग मधील पाण्याचा बांध फुटून आमची लाखो रूपयांची नुकसानी झाली. त्याला दोन महिने झाले. तरी अद्याप ना नुकसान भरपाई ना पालकमंत्र्यांचे दर्शन. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा ? आमचे सरकार म्हणून आम्ही काय अभिमान बाळगायचा अशी उद्विग्न प्रतिक्रिया कळणे येथील नुकसानग्रस्त युवक अभय पांडुरंग देसाई यांनी दिली आहे. मायनींग मधील पाण्याचा बांध फुटून कळणेवासियांचा संसार रस्त्यावर आला. सर्वजण नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आपले सत्ताधारी नेते कुठे राहिलेत ? १९ ऑगस्टपासून येणारे आपले मंत्री महोदय, आपले पालकमंत्री अजून कळणे मध्ये पोहोचलेले नाहीत. कळणेवासियांना त्यांनी विनाकारण ताटकळत ठेवले आहे हे कितपत योग्य आहे ? असा सवाल श्री. देसाई यांनी विचारला आहे. आपल्या हातात सत्ता असतानाही आपल्या लोकांना अशी वाट पहावी लागत आहे हे दुर्दैव आहे.