दर कमालीचा गडगडल्याने बागायतदार हवालदिल डझनाचा दर शंभर रुपये : निसर्गाची साथ लाभली पण..
प्रतिनिधी / मालवण:
कोकणातला हापूस आंबा यावेळी उशिराने आल्याने सध्या मार्केटमध्ये हापूसची किंमत कवडीमोल झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आणि व्यावसायिक हवालदील झाले आहेत. आंब्यावर प्रक्रिया करणारी एकही मोठी कंपनी सिंधुदुर्गात नसल्याने मोठय़ा प्रमाणात पिकलेला आंबा फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मार्केटही अनेक दिवस बंद असल्याने आंबा बागायतदार अडचणीत आला आहे. सध्या कोल्हापूर, बेळगाव मार्केटमध्ये कोकणच्या हापूसबरोबरच कर्नाटकातील हापूस आल्याने मोठी झळ कोकणच्या हापूसला बसली आहे. मार्केटमध्येही आंब्याला विक्री मिळत नसल्याने आता कॅनिंग सुरू झालेले आहे. मार्केटच्या शोधात काही व्यापारी पुणे, सांगली, सातारा याठिकाणीही आंबा विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
उशिरा हापूसचा हंगाम सुरू झाला. हापूस उशिराने आला, तरी पहिल्या काही दिवसांत व्यापाऱयांकडून पाच डझनाला 2000 ते 1500 रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे बागायतदार खूष होते. मात्र, काही दिवसांतच कोकणातल्या हापूसचा दर गडगडला. अडीच हजारावरून थेट 700 ते 400 वर येऊन पोहोचला. त्यानंतर आता डझनभर हापूसची किंमत झाली आहे, 100 रुपये.
आंबा पीक चांगले असूनही..
यावर्षी आंब्यावर कोणतेही डाग अगर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याने सर्व बागायतदारांमध्ये उत्साह होता. आता पाच डझनाबरोबरच एक आणि दोन डझनाच्याही पेटय़ा उपलब्ध झाल्याने त्याही भरून बागायतदार मार्केटमध्ये आंबा पाठवित होते. मात्र, एजंटांकडून आलेल्या दरामुळे पूर्णपणे निराशा हाती आली आहे. आंबा पीक टिकविण्यासाठी येणारा खर्च आणि मिळालेला दर याचा कुठेही हिशेब लागत नसल्याने आता करायचे काय? असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. मात्र, खवय्यांना स्वस्त दरात आंबा मार्केटमध्ये मिळत असल्याने त्यांच्या चेहऱयावर हास्य फुलले आहे.
दलालांकडून होते पिळवणूक
कोल्हापूर तसेच अन्य काही ठिकाणच्या दलालांकडून बागायतदारांना एक दर सांगितला जातो आणि आंबा पाठविल्यानंतर दुसराच दर दिला जात आहे. दलालांमुळे बागायतदार अडचणीत आला आहे. शासन यंत्रणेकडून कार्यवाही होत नसल्याने अगर बागायतदारांना आंब्यासाठी दर निश्चिती अगर ‘दलालराज’ संपविण्यासाठी सहकार्य होत नसल्याने बागायतदार अडचणीत आला आहे.
राजकर्त्यांची बोलाचीच कढी…
कोकण विकासाची चर्चा करताना अनेकदा आंब्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग उभारण्यावर चर्चा होते. अनेकदा निधीही आणल्याची भाषा होते. मात्र, कोकणचा हापूस कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आलेली असताना राज्यकर्त्यांची बोलाची कढी आणि बोलाचा भात समोर येतो. आतापर्यंत सिंधुदुर्गात आंबा पिकावर प्रक्रिया करणारा एकही मोठा उद्योग पूर्ण क्षमतेने उभा राहिलेला दिसत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांकडून भविष्यात तरी धोरणात्मक काम उभे राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
कॅनिंगचाही दर पडला
सुरुवातीला कॅनिंगचा दर 25 ते 26 रुपये प्रति किलो होता. मात्र, मार्केटमधून दर येत नसल्याने बागायतदारांकडून थेट बागेतूनच आंबा कॅनिंगला जाऊ लागल्याने कॅनिंगचा दर आता 12 ते 13 रुपयांपर्यंत स्थिरावला आहे. त्यामुळे मार्केटमध्येही नाही आणि कॅनिंगलाही दर नाही. म्हणून आंबा टाकून देण्याची वेळ बागायतदार व व्यावसायिकांवर आली आहे. मालवण तसेच जिल्हय़ातील इतर मार्केटमध्ये तर हापूस चक्क 80 ते 100 रुपये डझन झाला आहे. हापूसचाच दर उतरल्यामुळे पायरी आंब्याला, तर 80 ते 90 रुपये दर मिळत आहे. मार्केटमध्येही आंबाच आंबा दिसत आहे. त्यामुळे समाधानकारक दर मिळणे कठीण झाले आहे.