बेळगावच्या कवींचा उलगडला प्रवास : शहापूर येथील सरस्वती वाचनालयात वसंत व्याख्यानमालेच्यावतीने शांता शेळके जन्मशताब्दी महोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न तुम्ही केला होतात.आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते… अशा शब्दात कवी अविनाश ओगले यांनी टिळकांना श्रद्धांजली वाहत सरकारवर विडंबनात्मक ताशेरे ओढले होते. एक कवी हा समाजातील विसंगती दाखविण्याचा प्रयत्न करतो. समाजात सुरू असणारा संघर्ष कवितांमुळे पुन्हा एकवार विचार करायला लावतो, हे रविवारी आयोजित काव्य मैफलीतून दिसून आले.
वसंत व्याख्यानमालेच्यावतीने ज्ये÷ कवयित्री कै. शांताबाई शेळके जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘काव्य रंगपंचमी’ या कार्यक्रमाचे शहापूर येथील सरस्वती वाचनालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चार कवयित्रींनी बेळगावशी संदर्भ असणाऱया कवींच्या कविता सादर केल्या. विद्या देशपांडे यांनी कवी अविनाश ओगले यांच्या कविता, विडंबन, चारोळय़ा सादर केल्या.
डॉ. आसावरी संत यांनी कवयित्री इंदिरा संत यांच्या कार्याचा आढावा घेतला. आजीसासू म्हणून इंदिरा संत यांच्याशी असणारे ऋणानुबंध त्यांनी उलगडले. त्यांची सुरंगा ही कविता सादर केली. डॉ. संजीवनी खंडागळे यांनी शांताबाई शेळके यांच्या कवितांचा आढावा घेतला. हर्षदा सुंठणकर यांनी कृ. ब. निकुंब यांच्या कविता सादर केल्या. शोभा लोकूर यांनी शंकर रामाणी यांचा प्रवास उलगडून दाखविला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहा सांगलीकर व पूजा नातू यांनी ईशस्तवन सादर केले. वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर यांनी स्वागत केले. प्रा. स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. यावेळी वसंत व्याख्यानमालेचे सदस्य उपस्थित होते.