प्रतिनिधी / बेळगाव
‘निवडणुकीचे पेव आता फुटले रे,
गल्ली बोळात भोंगे वाजू लागले रे
हे देतो, ते देतो, आश्वासनांचा भडिमार,
आशेसाठी लाच त्यांनी वाटली रे,
शेवटी निराशा पदरी पाडली रे,
या कवितेतून नवोदित कवी तुकाराम कुऱहाडे यांनी नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकींमधील धुरळय़ावर भाष्य केले. निवडणुका जिंकण्यासाठी आश्वासनांची खैरात वाटली जाते. अनेक प्रलोभने दाखविली जातात. निवडणुका जिंकल्यानंतर मात्र सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडते. हे या कवितेतून मांडण्यात आले आहे.
20 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱया सत्रात निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन पार पडले. या संमेलनातून वास्तवतेवर भाष्य करण्यात आले. कवी अशोक आलगोंडी यांनी आपल्या खुबीने कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. कवी भरत गावडे यांनी कावळा ही कविता सादर केली. सर्वेश सुतार या बालकवीने एकत्र कुटुंब यावर कविता सादर केली. कवयित्री विजया उरणकर यांनी बाग, राजाराम कट्टी यांनी वर्दी, रोशनी हुंदरे यांनी पोशिंदा ही शेतकऱयांच्या जीवनावरील कविता सादर केली.
कवी प्रा. दिनेश शिंदे यांनी कोण जगतो कोणासाठी ही अप्रतिम कविता सादर केली. प्रा. अशोक आलगोंडी यांनी वांझोटा, आनंद मेणसे यांनी प्रेम संभाषण, चंद्रशेखर गायकवाड यांनी व्यथा, स्मिता पाटील यांनी आम्ही जगायचं कसं, जयवंत जाधव यांनी महासत्ता, स्मिता किल्लेकर यांनी कवितेचे गाव, या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.