प्रतिभासंगम कवी संमेलन संपन्न
सांगली / प्रतिनिधी
असहिष्णू, अन्यायी कालखंडात सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून माणूसपणाच्या कविता महत्त्वाच्या ठरतात. वास्तवाशी सूचकपणे जोडून घेणारा, वर्तमानाच्या फुग्याला टाचणी लावण्याचे काम करून समानतेच्या वाटेकडे नेणारा कवी कवितेतून जगण्याच्या गुंत्यातून समाजाला सोडवू शकेल. छत्रपती शाहूंचे प्रशासन महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अनुभवावे. शाहूंची कारकीर्द कवींनी आपल्या लेखणीने समाजासमोर आणावी,तेच दिशादर्शक ठरेल,असे मत प्रा. अनिलकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
प्रतिभासंगम प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कविसंमेलनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने हे संमेलन ऑनलाईन पार पडले.
कवी आनंदहरी, महेश कराडकर,प्रा. भीमराव धुळूबुळू, दयासगर बन्ने, अभिजीत पाटील ,गौतम कांबळे, मुबारक उमराणी, मनीषा पाटील , आदींनी कवितावाचन केले. या कवितांमधून राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करतानाच माणुसकी, निसर्गप्रेम, स्त्री जाणिवा, समतेचा कृतिशील आदर्श, भविष्यातील सघन जगण्याच्या गुंतवणूकीचे भाष्य विविध कवींनी केले. आंतरिक कळवळीच्या अत्यंत परखडपणे कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संयोजन प्रतिभासंगम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दयासागर बन्ने व सहका-यांनी केले.