प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
कणकवली आवानओल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 2019 च्या कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कारासाठी जुन्नर पुणे येथील कवी अनिल साबळे यांच्या लोकवांड.मय गृह प्रकाशनने ( मुंबई ) प्रकाशित केलेल्या ‘टाहोरा’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.पाच हजार रुपये,स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कणकवली येथे होणाऱ्या आवानओल प्रतिष्ठानच्या दशवार्षिक वसंत सावंत स्मृती उगवाई काव्य उत्सवात कवी साबळे यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
साबळे हे जुन्नर येथील आदिवासी शाळेत कार्यरत आहेत. अलीकडल्या काळात त्यांची कविता मराठीतील अनेक महत्त्वाच्या वाड.मयीन नियतकालिकातूनही सातत्याने प्रसिद्ध होत असते. ‘टाहोरा’ संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर या कवितेकडे जाणकारांचे लक्ष वेधले गेले. त्यातूनच नव्या पिढीतील एक सशक्त कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून आपल्या सामाजिक भावनेतून त्यांचे काव्य लेखन सातत्याने चालू आहे. आदिवासी माणसांविषयी अपार करुणा बाळगत सहभावानं मानवतेची कास धरत हा कवी आपल्या कवितेतून त्यांच्या सुखदुःखाला कायम सोबत करतो. तसेच पशुपक्ष्यांशी, नद्या झाडांशी, डोंगर-दऱ्या आणि रान शिवराशी रक्ताच नातं असावं असा आत्मीय जिव्हाळा कवितेतून जपतानाच आदिवासी लोकजीवनाची सद्यस्थिती अधोरेखित करतो.यामुळेच कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कारासाठी त्यांच्या ‘टाहोरा’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याचे आवानओल प्रतिष्ठानतर्फे स्पष्ट करण्यात आले.
आवानओल प्रतिष्ठानतर्फे मागील नऊ वर्षे कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितेची चळवळ राबविली जाते. त्याचा आता दशवार्षिक सोहळा साजरा करण्यात येत आहे. समकालीन पिढीतील कवीना प्रोत्साहन देणे आणि त्यांची काव्य गुणवत्ता चोखंदळ काव्य रसिकांसमोर आणणे या उद्देशाने आवानओल प्रतिष्ठानच्या काव्य चळवळीतर्फे कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार मराठीतील मागील दोन वर्षातील एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला दिला जातो. यापूर्वी या पुरस्काराने कवी एकनाथ पाटील, शरयू आसोलकर, अनुजा जोशी अभय दाणी, विनोद कुमरे, श्रीधर नांदेडकर, सुजाता महाजन, सुशीलकुमार शिंदे, सुचिता खल्लाळ आदि कवींना गौरविण्यात आले असून 2019 च्या या पुरस्कारासाठी कवी साबळे यांच्या ‘टाहोरा’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.