प्रतिनिधी/ बेळगाव
कोणत्याही भाषेतील वाङ्मयामध्ये काव्य हे शाश्वत आनंद देणारे, चिंतन करायला लावणारे आणि रसिकतेला खाद्य देणारे असते. काव्य निर्मितीसाठी केवळ शब्द भांडार उपयोगाचे नाही तर त्यासाठी प्रतिभा आणि स्फूर्ती आवश्यक आहे, असे मत प्रा. विजया धोपेश्वरकर यांनी व्यक्त केले.
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे बेळगावचे कवी कृ. ब. निकुंब यांच्या जन्म शताब्दीनिमित्त 3 दिवसांची ‘काव्यावर्त’ ही ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येत आहे. रविवारी दुपारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करताना प्रा. धोपेश्वरकर यांनी हे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मराठी काव्याची पूर्वपीठिका संस्कृत पंडितांनी बारकाईने केली आहे. ‘वाक्मयं रसात्मक काव्यम्’ असे म्हटले जाते. वाक्मय हे काव्याचे बहिरंग आहे, तर रसात्मकता हे काव्याचे अंतरंग आहे.
भाषा हे काव्याचे माध्यम आहे. सर्व मराठी वाङ्मयामध्ये संतांनी प्रामुख्याने मराठी नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा, विश्वकल्याण आणि आत्म प्रचितीसाठी रचना केल्या. शिवकालापूर्वी उर्दूचे आक्रमण झाले. म्हणूनच बखर वाङ्मयामध्ये उर्दू शब्द दिसतात. मराठी भाषेला शुद्धता यावी, वैचारिक परिपूर्णता मिळावी, यासाठी शिवरायांनी प्रयत्न केले. चिपळूणकरांनी निबंधमाला सुरू केली. मराठी साहित्य निर्माण करताना भाषिक संघर्षातूनच वाट काढावी लागली, हे वास्तव आहे, असे प्रां धोपेश्वरकर म्हणाल्या.
काव्यलेखनासाठी केवळ शब्द भांडार उपयोगाचे नाही. तर प्रतिभा आणि स्फूर्ती हवी. प्रतिभा ही समर्थ आणि नंदादीपासारखी असते तर स्फूर्ती तरल आणि वीजेसारखी असते. कवी अज्ञाताचा, लौकिकाचा, नावीन्याचा वेध घेतो ते स्फूर्तीची ओढ असते म्हणून. मात्र त्यात नवनिर्मितीचा आनंद आहे. काव्यातून जेव्हा प्रचार, प्रसार, लोक जागृती, परहित, हे हेतू स्पष्ट होतात तेव्हा ते काव्य रसिकांना आवडते. काव्य निर्माण होण्यासाठी वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. सहृदयता, वाचन, निरीक्षण, आस्वादकता, लोकजीवन, अंतर्मुखता, बहुश्रुतता, व्यासंग या सर्वांचा संगम झाल्यावरच सकस आणि विशुद्ध काव्य निर्मिती होते, असे सांगून प्रा. धोपेश्वरकर यांनी समारोप केला.
प्रारंभी शारदोत्सवाच्या अध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांनी स्वागत केले. निकुंबांच्या विद्यार्थी सुगंधा जठार यांनी निकुंब सरांचा शब्दावरचा प्रभाव विलक्षण होता. आपल्या प्रश्नांना नेमके उत्तर मिळणार हा विश्वास विद्यार्थ्यांना असायचा. शिकविणे आनंददायी होते, हे केवळ त्यांच्या संस्कारामुळे समजले, असे सांगितले. प्रा. आनंद गाडगीळ यांनी आपण विज्ञान शाखेचे असलो तरी केवळ निकुंबांच्यामुळे मराठी साहित्याची आपल्याला गोडी लागली, असे सांगितले. यानंतर श्रीराम पचिंदे यांनी गझल लेखन यावर मार्गदर्शन केले.