प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणातील कशेडी घाटातील बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलादपूर-खेड दरम्यान असलेल्या महामार्गाच्या डोंगरातून आतापर्यंत 730 मीटर अंतराचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे.
भोगाव खुर्दपासून भुयारी मार्गाच्या दुसऱया बाजूचेही उत्खनन युद्धपातळीवर सुरू आहे. खोदकामादरम्यान कातळ फोडण्यासाठी बुमरचा वापर केला जात आहे. बोगद्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कंबर कसली आहे.
कशेडी घाटात चौपदरीकरणाचा मार्ग खडतर असल्याने याठिकाणी भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता तयार करण्यात येत आहे. घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याच्या कामाचा ठेका रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगदा तीनपदरी करण्यात येणार आहे दोन भुयारी मार्गाचा समावेश आहे. यासाठी 441 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2018 मध्ये अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट व कन्स्ट्रक्शन यांच्यासमवेत तसा करारही केला आहे.
यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे. या रस्त्याचे कामही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत आहे. आपत्काळात उपयुक्त असलेले वायूविजन सुविधेच्या भुयाराचाही समावेश आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱया कनेक्टीव्हिटीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. आतील भागात परत यू टर्न घेणाऱया वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टीव्हिटी भुयारी मार्गामध्ये करण्यात येणार आहे.
2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात खवटी येथून भुयारी मार्गाच्या कामास प्रारंभ झाला. नियोजित भुयारी मार्गापर्यंत सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री जाण्यासाठी रस्त्यांचा ठेका घेतलेल्या कंपनीने सक्षम रस्ते बनवल्यानंतर या कामाला खऱयाअर्थाने सुरूवात झाली. तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडण्यासाठी बुमरचा वापर करण्यात येत आहे. 20 मीटर रूंदी व 6.5 मीटर उंची अशापद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बुमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारी मार्गामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सुरूंग स्फोटासाठी जिलेटीनचा वापरही केला जात आहे.
भुयारातील कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड चौपदरीकरणाच्या कामामध्ये वापरण्यात येत आहेत. ठेकाधारक रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बोगद्याच्या कामाला गती दिल्यामुळेच आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. एप्रिल 2021 पर्यंत घाटातील बोगद्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी व्यक्त केली आहे.