वार्ताहर / कसबा बावडा
कसबा बावडा सरवळ, हुबंरमळी दरम्यान पाडुरंग पाणी पुरवठा सर्व ऊस क्षेत्रातील ऊसाला दुपारच्या वेळी अचानक आग लागून चाळीस एकर ऊसक्षेत्र जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांच्या नुकसानीची झळ शेतकर्यांना बसली आहे. पावसानतंर पाणी न दिल्याने ऊस पुर्ण वाळला होता. अचानक लागलेली आग बघता-बघता वाऱ्यामुळे सर्वत्र पसरली आणि एकच हाहाकार उडाला. रस्ता दिसेल तिकडे शेतकरी, शेतमजुरपळू लागले होते. आगीचा जोर इतका भयानक होता की, वारा फिरेल तशा आगीच्या ज्वाळा सरकत होत्या. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमनच्या दोन गाडया घेऊन अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी गाडी जाईल, तेथपर्यंत आग आटोक्यात आणली. दरम्यान आग विझवण्यासाठी उसात शिरलेला युवकाला सुखरूप बाहेर पडता आले. नाहीतर मोठी घटनेला सामोरे जावे लागले असते.
आमदार ऋतुराज पाटील, श्रीराम सेवा संस्येचे सभापती धनाजी गोडसे, संचालक मंडळ नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, मंडल कृषी अधिकारी ए.आर. निगुरे, तालुका कृषी अधिकारी डी. एस. देशमुख, कृषी सहायक आर. आर पाटील, गाव कामगार तलाठी आर. डी. कोरे, कोतवाल सर्जेराव काळे यांनी संपूर्ण जळीतक्षेत्राची पाहणी केली. आमदार ऋतूराज पाटील यांनी राजाराम कारखाना चेअरमन सर्जेराव माने यांच्याबरोबर संपर्क साधून जळीत ऊसक्षेत्रास तोडणी सुरु करण्याबाबत चर्चा केली. आगीत सुमारे चाळीस शेतकर्यांचा समावेश असून सर्वांच्या क्षेत्रांच्या पंचनाम्याची कामे सुरू आहेत.