कोल्हापूर/प्रतिनिधी
कसबा बावडा येथील आंबे गल्लीमध्ये राहणाऱ्या एका युवकावर तिघांच्या टोळक्याने पूर्ववैमस्यातून शस्त्र हल्ला करुन, त्याचा खूनाचा प्रयत्न केला. सागर शामराव सुतार ( वय २०, रा. आंबे गल्ली , कसबा बावडा ) असे जखमी युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलिसात झाली आहे.
या प्रकरणी विकास वेताळे ( रा . दत्त मंदीर, कसबा बावडा, कोल्हापूर ), साहील शेख, सुदर्शन चव्हाण ( दोघे रा . मातंग
वसाहत, कसबा बावडा, कोल्हापूर ) या तिघाच्या विरोधी खूनाचा प्रयत्न केल्याविषयी गुन्हा नोंद झाला आहे. हे तिघेही अद्यापी पसार असून त्याचा शोध सुरु आहे.
याबाबत पोलिसाच्याकडून समजलेली माहिती अशी, जखमी सागर सुतार हा अक्षय लांबतुरे व अमन शेख यादोघा मित्राबरोबर डी. वाय. पाटील इंजिनिअर कॉलेजच्या गेटसमोरील पार्किंगच्या कट्टयावर बोलत बसला होता. त्याठिकाणी संशयीत आरोपी विकास वेताळे, साहील शेख, सुदर्शन चव्हाण हे तिघे जण आले. त्यानी सागर सुतारवर सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, त्याच्यावर शस्र हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.
या हल्ल्यात संशयीत आरोपीनी कोयत्याचा वापर केल्याचे पोलिसाच्या तपासात पुढे आले आहे. तर या हल्ल्यात जखमी सागरच्यात डाव्या हाताच्या काखेखाली, बरगडीवर, उजव्या पायाच्या नडगीवर, डाव्या हाताच्या बोटावर गंभीर वार करण्यात आले आहेत.