कोगे येथे मेन लाईन वायर तुटल्याने 30 ते 40 वीज मीटर खराब
कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, कसबा बीड, गणेशवाडी, शिरोली, चाफोडी आदी भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गेली दोन दिवस उन्हाचा तडाका व उकाडा यामुळे संपूर्ण ग्रामीण भाग हैराण झाला होता.पण आज रविवारी सायंकाळी सहानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे वीट भट्टी, शेतकऱ्यांची रब्बी पिके यांचे नुकसान झाले. जोरदार वारा व विजेचा कडकडाट यामुळे संपूर्ण ग्रामीण भागात भयभीत व गारव्याचे वातावरण निर्माण झाले.
कोगे करवीर येथे विजेच्या कडकडाट व जोरदार वाऱ्यामुळे उच्च दाब निर्माण होऊन येथील जवळपास 30 वीज मीटर खराब झाले आहेत. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वरती ताण पडला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीट भट्टी कामगार व तयार केलेला कच्चामाल यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अवकाळी होणाऱ्या पावसामुळे वीट भट्टी कामगार व व्यावसायिकांवर आणखीन ताण पडत आहे.