कसबे डिग्रज / वार्ताहर
जुलै महिन्यात येऊन गेलेल्या महापुरात कसबे डिग्रजच्या अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आणि परवाना धारक असून सुद्धा मदतीपासून जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. या गंभीर प्रकारामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला असल्याने गावातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त आणि आक्रमक झाला आहे. या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. महापुरामुळे अनेक व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त व्यावसायिकांचे पंचनामे पूर्ण करून अर्ज घेण्यात आले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी एका खाजगी फार्म हाऊसवर बसून अंतिम यादी बनवली आहे.
अंतिम यादी बनवताना जे पात्र नुकसानग्रस्त आहेत अशा व्यवसायिकांना अपात्र ठरवण्याचा अजब कारभार केलेला आहे. पात्र यादी ठरवताना संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप व्यापारी संघटनेकडून होत आहे. कसबे डिग्रजचे मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक या जबाबदार अधिकाऱ्यांनी फार मोठा गोंधळ घालत पात्र व्यवसायिकांना वंचित ठेवले आहे.
या गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यापारी संघटनेने आंदोलन करत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. या व्यावसायिक पूरग्रस्त मदतीची चौकशी होऊन अन्याय झालेल्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका व्यापारी संघटनेने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मंत्री जयंत पाटील यांनी या संपूर्ण व्यावसायिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, तसेच या मदतीमध्ये गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, जेष्ठ नेते आनंदराव नलवडे, भरत देशमुख, युवराज जाधव, दत्तात्रय शिरगावे, निखील तेली, गणेश परीट, नियाज मुलाणी आदींसह व्यापारी उपस्थित होते.