कसबे डिग्रज/प्रतिनिधी
मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज गावच्या लोकनियुक्त सरपंच किरण लोंढे यांच्या प्रत्येक बाबतीतील मनमानी आणि एकाधिकारशाही कारभारामुळे सत्ताधारी नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सरपंच सर्वच बाबतीत ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख मंडळींना विश्वासात घेत नाहीत, गावात विकासकामांमध्ये राजकारण करतात, कामगारांचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले आहेत, सरपंचांचे पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करून भ्रष्टाचार करतात या विविध कारणांमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपसरपंच संदीप निकम यांच्यासह नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देत असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आनंदराव नलवडे व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच संदीप निकम, माजी उपसरपंच प्रमोद चव्हाण, संजय शिंदे, सागर चव्हाण, आरिफ खाटीक त्याचप्रमाणे सदस्या अश्विनी परीट, सुजाता कामेरीकर, मीनाक्षी जाधव, सविता काटकर आदी सदस्यांनी राजीनामे दिले.
दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचारी थकीत पगार, विमा, थकीत भविष्य निर्वाह निधी, मयत कामगार कुटुंबीयाना मदत मिळाली नाही, विकासकामात होणारे राजकारण यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि नेत्यांची बदनामी होत आहे. गावातील विविध कामांची बिले थकित आहेत, महापूर आणि कोरोना यासारख्या आपत्तीच्या बाबतीत सरपंच उदासीन आहेत. सरपंचांचे पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात, सगळीकडे आपण स्वतः जातात, ग्रामपंचायत सदस्य यांनी सुचवलेली कामे जाणीवपूर्वक करत नाहीत, तसेच अनेक चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायतीची बदनामी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वित्त आयोगाची कामे होत नाहीत परंतु विकास कामांची नुसतीच बिले ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी संगनमताने काढली असून त्यामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार झाला आहे असे संजय शिंदे यांनी सांगितले.