महामार्ग प्राधिकरणचा गोंधळ
वार्ताहर / कसाल:
मुंबई-गोवा या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गावर आता महामार्गावरील गावांचे बोर्ड लावण्याचे काम सुरू झाले आहे. कसालमध्ये लावण्यात आलेल्या महामार्गावरील बोर्डामुळे सध्या गोंधळ उडाला आहे. ‘कसाल’ ऐवजी ‘कारलेवाडी’ असा बोर्ड कसालच्या दोन्ही बाजूंनी लावत महामार्ग प्राधिकरणने कसालचे नामकरण केले आहे. महामार्गावरील या कसाल गावच्या नवीन नावामुळे प्रवाशांची मात्र फसगत होत आहे.
मुंबई-गोवा या आंतरराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आता हे काम अंतिम टप्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हे काम काही काळ बंद झाले होते. मात्र आता पुन्हा हे काम सुरु झाले आहे. या महामार्गाच्या बांधणीबरोबरच या महामार्गावरील, बस थांबे, आवश्यक त्या ठिकाणी लाईट व्यवस्था, महामार्गाची रंगरंगोटी, सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना आदी सर्व बाबी पूर्ण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर या महामार्गावर दिशादर्शक फलक, किलोमीटर दर्शक फलक, गावदर्शक फलक लावले जात आहेत.
असेच फलक कसाल येथेही लावण्यात आले आहेत. कसाल हे मुंबई-गोवा महामार्गावर असलेले फार जुने गाव. महामार्गालागत असलेल्या या गावामधे फार पूर्वीपासून एसटी स्टॅण्ड आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्वात महत्त्वाचा आणि पर्यटकांच्या पसंतीचा असा पर्यटन तालुका मालवण या ठिकाणी जाण्यासाठीही कसालमधूनच जावे लागते. या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने कसालचे कारलेवाडी असे नामकरण केल्याने प्रवाशांचा मात्र गोंधळ उडत आहे. खरे तर कारलेवाडी ही कसालची एक वाडी आहे. ही वाडी कसाल महामार्गापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटरवर आहे. तरीही या वाडीचे नाव कसाल गावाला देण्यात आले आहे.