प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या माध्यमातून कस्तुरबा लसीकरण केंद्रावर नेटके नियोजन करण्यात आलेले असूनही दोन दिवसांपूर्वी लसीकरणाच्या टोकन वाटपावरुन गोंधळ निर्माण झाला होता. नगरसेवक अविनाश कदम यांनी लसीकरणात वशिलेबाजीचा आरोप केला होता. दरम्यान, शनिवारी स्वतः शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे केंद्रावर जावून त्यांनी शिस्त लावली. तेथील कर्मचाऱयांची चांगलीच शाळा घेतली.
कस्तुरबा रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये लस घेण्यासाठी वशिला चालत असल्याचा आरोप झाल्यानंतर व प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती. त्याच दिवशी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सर्व टोकन पाहिले होते. ते टोकन आडनिड नंबरचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्या टोकन घेतलेल्यांचे म्हणणे समजून घेतले होते. शनिवारी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे तेथे पोहचले. त्यांनी लसीकरण केंद्रावरील परिस्थिती पाहून टोकन वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आरोग्य कर्मचाऱयांचा शाळा घेतली. त्यांनी टोकन वाटपाला किती वाजता सुरुवात होणार आहे हे विचारले. त्याचवेळी पहिल्या शंभर नागरिकांना टोकन द्या अन् त्यांनाच लस द्या. इतरांना विनाकारण थांबू नका अशी विनंती करा. कोणी गोंधळ घालत असेल तर मला लगेच फोन करा. पाचव्या मिनिटाला येथे पोहचतो. प्रत्येकाला लस घ्यायची आहे. परंतु असा गेंधळ निर्माण करुन परिस्थिती निर्माण करु नका, त्यात सुसुत्रता आणा, अशा सूचना त्यांनी दिल्या.