अत्यंत विचित्र भाषेत बोलतात लोक
भारताला गावांचा देश म्हटले जाते. देशातील सुमारे दोन-तृतीयांश लोकसंख्या गावांमध्ये राहते. पण काही गाव स्वतःच्या विशेष कारणांमुळे देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. असेच एक गाव हिमाचल प्रदेशात आहे. या गावातील लोक अशा भाषेत संवाद साधतात, जी येथी लोकांच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाच समजत नाही.
मलाणा हे हिमाचल प्रदेशातील हिमाच्छादित पर्वत आणि दऱयांनी वेढले गेलेले गाव आहे. सुमारे 1700 लोकसंख्या असलेले हे गाव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. जगभरातून लोक या गावाला भेट देत असतात. पण मलाणा पर्यंत पोहोचणे अत्यं अवघड आहे. या गावासाठी कुठलाच रस्ता नाही. पर्वतांना ओलांडूनच येथे पोहोचता येते. पार्वती खोऱयाच्या पायथ्याला असलेल्या जरी गावातून थेट चढाई करावी लागते.
अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले असता त्याच्या काही सैनिकांनी मलाणा गावात आश्रय घेतल्याचे आणि ते येथेच राहिल्याचे सांगण्यात येते. येथील ग्रामस्थांना अलेक्झांडरच्या सैनिकांचे वंशज मानले जाते. पण हे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही. पण त्या काळातील अनेक गोष्टी गावात आढळल्या आहेत.
मलाणा गावातील लोक कनाशी नावाची भाषा बोलतात, जी अत्यंत रहस्यमय आहे. ग्रामस्थ या भाषेला अत्यंत पवित्र मानतात. याचे वैशिष्टय़ म्हणजे ही भाषा मलाणाव्यतिरिक्त जगात अन्यत्र कुठेच बोलली जात नाही. ही भाषा बाहेरील लोकांना शिकविली जात नाही. पण यावरून अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे.
मलाणा गावातील वृद्ध बाहेरील लोकांशी हस्तांदोलन करणे आणि त्यांना स्पर्श करणे देखील टाळतात. जर तुम्ही येथील दुकानात काही सामग्री खरेदी केल्यास तो दुकानदार तुमच्या हातात देण्याऐवजी सामग्री तेथेच ठेवेल. तसा पैसे देखील स्वतःच्या हातात घेण्याऐवजी ठेवण्यास सांगतो. पण येथील नवी पिढी या गोष्टी मानत नाही. बाहेरील व्यक्तीशी बोलण्यास, हस्तांदोलन करण्यास ते तयार आहेत.
या गावातील लोक विवाह देखील स्वतःच्या गावातच करतात. कुणी गावाबाहेर विवाह केल्यास त्याला समाजातून बेदखल केले जाते. मलाणा गावातील चरसला मोठी मागणी आहे. चरस भांगाच्या रोपापासून तयार करण्यात आलेला एक अमली पदार्थ आहे.