आसाममध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप परिणाम हाती येण्यासाठी बराच वेळ आहे. तसेच हे परिणाम कोणत्या बाजूने लागतील याविषयीही कोणतेही निश्चित अनुमान कोणी व्यक्त केलेले नाही. तथापि, काँगेस आणि एआययुडीएफ या पक्षांनी आपले काही उमेदवार आतापासूनच राजस्थानला हलविले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाचे आमदार अन्य पक्षात जाऊ नयेत म्हणून त्यांना अन्यत्र हलविले जाते. गेल्या काही काळात कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये सत्तानाटय़ रंगले होते, तेव्हा अशी आमदारांची हालवाहालव करण्यात आली होती. पण आसाममध्ये निवडणूक परिणाम घोषित होण्याच्या आधीच अशी हालचाल विरोधी गटात झाल्याने तो एकाचवेळी विनोदाचा आणि गंभीरही विषय बनला आहे. विरोधकांनी याची कारणे दिली आहेत.
मतदानापूर्वीच उमेदवाराचे पक्षांतर
आसामच्या बोडो बहुल विभागात काँगेसच्या बासुमतारी नामक उमेदवाराने तिसऱया टप्प्याचे मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केले. त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये आता काँगेसचा अधिकृत उमेदवारच नाही अशी स्थिती आहे. याचाच अर्थ असा की आता निवडणुकीचा परिणाम समोर येण्यापूर्वीच पक्षांतर करण्याचा नवा पायंडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी काँगेस-एआययुडीएफ आघाडीने आपले काही उमेदवार राजस्थानात नेल्याची चर्चा आहे.