पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात, विरोधकांवर जोरदार टीकाप्रहार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस नसती तर देशाचे काय झाले असते, या काँगेसच्या प्रश्नाला घणाघाती प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. राज्यसभेत मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱया प्रस्तावावर बोलताना त्यांनी विरोधी पक्षांच्या विरोधात रुद्रावतार धारण केल्याचे पहावयास मिळाले. विरोधकांवर टीकाप्रहार करतानाच त्यांनी गेल्या सात वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांचाही अविस्तर आढावा घेऊन विरोधकांचे सर्व आपक्षे झिडकारले. सोमवारी त्यांनी लोकसभेत आभार प्रस्तावावर अशाच आवेशात विरोधकांचा समाचार घेतला होता.
काँगेस नसती तर काश्मीरी पंडितांवर आपल्याच देशात बेघर होण्याची वेळ आली नसती, दहशतवादाच्या आगीत पंजाब होरपळला नसता, आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला गेला नसता, तसेच देशात सुख आणि समाधान नांदले असते, अशा खरपूस शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमृतमहोत्सवी वर्षात संकल्प
हे देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. या वर्षी आपण पुढील 25 वर्षांमध्ये देशाची कशा प्रकारे प्रगती होईल यावर विचार केला पाहिजे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारने याची रुपरेषा स्पष्ट केली आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांपैकी जे अधिक महत्वाचे आहेत, त्यांच्यावर आपण प्राधान्याने काम केले पाहिजे. देशाला समृद्ध बनविले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनेक सामाजिक योजना
गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या आव्हानात्मक काळात केंद्र सरकारने अनेक सामाजिक आणि कल्याणकारी योजना क्रियान्वित केल्या. गरीबांच्या घरची चूल पेटती रहावी, यासाठी 80 कोटी गरीबांना विनामूल्य धान्य दिले. या काळातही गरीबांना पक्के घर देण्याची योजना सुरुच ठेवली. कोरोना रोखण्यासाठी देशव्यापी लसीकरण अभियान हाती घेतले आणि विक्रमी वेळेत ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विरोधकांनी अनेक अडथळे या अभियानात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर मात करुन आम्ही आमचे ध्येय वेंगाने पूर्ण करत आहोत, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
स्वच्छ पाणी योजना
आमच्या सरकारने देशात प्रथमच 5 कोटी ग्रामीण परिवारांना पिण्याचे स्वच्छ पाणी नळाद्वारे पुरविण्यात येत आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात आम्ही ग्रामीण भागातील लोकांना कोरोनापासून दूर ठेवण्यात मोठय़ा प्रमाणात यश प्राप्त केले. तथापि, कोरोनासंबंधी आम्ही आयोजित केलेल्या बैठकीला काही विरोधी पक्ष उपस्थितसुद्धा राहिले नाहीत. असे संकुचित मनोवृत्तीचे नेते आणि पक्ष आज आम्हाला उपदेश करीत आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
विक्रमी धान्य खरेदी
आम्ही यंदा किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत विक्रमी धान्य खरेदी शेतकऱयांकडून केली आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा दिली आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात संरक्षण कॉरीडॉर बनविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे. सीमाभागांमध्ये रस्ते बांधले जात आहेत. संरक्षणाच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक छोटे आणि मध्यम उद्योग आता उत्साहाने पुढे येत आहेत, अशा बाबी त्यांनी आवर्जून उल्लेखिल्या.
काँगेसचा सभात्याग
पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना विरोधकांनी अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजीही केली. भाषणानंतर त्यांनी सभात्याग केला. पंतप्रधान मोदींनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत, असा आरोप झाला.
बॉक्स
महागाई रोखण्यासाठी कंबर कसली
गेल्या दोन वर्षांमध्ये सरकारने महागाई रोखण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. 2014 ते 2020 या काळात महागाई दर 4.5 टक्के इतक्या मर्यादेत राहिला. काँगेसच्या सरकारच्या काळांमध्ये हाच दर 10 टक्क्यांहून अधिक रहात होता, ही बाब कोणीही विसरणार नाहीत. विरोधकानी यासंदर्भात त्यांचा इतिहास लक्षात घ्यावा, असे टोमणेही त्यानी लगावले.
बॉक्स
सर्वाधिक विकासदराचा देश
कोरोना काळातही भारताने जगातील सर्वात जास्त विकासदर राखला आहे. मोठी अर्थव्यवस्था असणाऱया देशांमध्ये अशी कामगिरी करुन दाखविणारा भारत हा एकमेव देश आहे. रोजगार क्षेत्रातही सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. 2021 च्या आर्थिक वर्षात 1.20 कोटी लोक ईपीएफओशी (भविष्यनिर्वाह निधी योजना) जोडले गेले आहेत. त्यांच्यापैकी 60 ते 65 लाख लोक 18 ते 25 या वयोगटातील आहेत. या संबंधातील अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या बेरोजगारी वाढल्याच्या आरोपातील हवा गेली आहे. यामुळे निराशाग्रस्त झालेले विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.