कोलारमध्ये प्रजाध्वनी मेळावा : सहकारी संघांमधील महिलांची कर्जे माफ :
अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 10 हजार कोटी अनुदानाची तरतूद
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. राज्य काँग्रेसकडून राज्यभरात प्रजाध्वनी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी कोलारमध्ये प्रजाध्वनी मेळावा आयोजिण्यात आला होता. या मेळाव्यात काँग्रेसने पक्ष सत्तेवर आल्यास अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. संपूर्ण राज्यातील सहकारी संघांमधून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करण्यात येतील, अशी आश्वासने दिली.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोलारमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सोमवारी येथील प्रजाध्वनी मेळाव्यात सिद्धरामय्या यांनी आश्वासनांची खैरात केली आहे. ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवड्यातून एकदा बोलावण्यास प्रारंभ केला आहे. मोदी कर्नाटकात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देतील, या भ्रमात येथील नेते आहेत. नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा राज्यात शंभर वेळा येऊन गेले तर निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर येण्यापासून कोणीही रोखणार नाही, असे त्यांनी सांगितले.
40 टक्के कमिशनच्या मुद्द्याकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष
भाजप सरकारइतके भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीही सत्तेवर नव्हते. प्रत्येक कंत्राटामागे 40 टक्के कमिशन द्यावे लागत असल्याची तक्रार कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांकडे केली होती. मात्र, त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. तपास सुरू करा, आपण पुरावे सादर करू, असे कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केंपण्णा यांनी सांगितले आहे. मात्र, आधी तपास सुरू करण्याआधीच मुख्यमंत्री बोम्माई पुरावे मागत आहेत. आपण विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे 40 टक्के कमिशनच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले होते. मात्र, कोणती ना कोणती कारणे पुढे करून त्यांनी नकार दिला. त्यांच्यासारखे सभाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिलेला नाही, अशी टीका सिद्धरामय्यांनी केली.
…तरच कोलारमधून निवडणूक लढविणार
संपूर्ण राज्यातील सहकारी संघांमधून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करण्यात येतील. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी 10 हजार कोटी रुपये अनुदान राखून ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आपण कोलारमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठींनी संमती दर्शविली तरच आपण येथून निवडणूक लढविणार आहे, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.