तीन समित्यांची निर्मिती : नाराजांना थोपविण्याचा सोनिया गांधींचा प्रयत्न
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसमधील जेष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये रंगलेल्या वादामुळे नाराज असलेल्या जेष्ठ नेत्यांना थोपविण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराज ज्ये÷ांपैकी काहींची पक्षाच्या महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती केली आहे. पक्षाकडून परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थविषयक समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या तीनही समित्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची वर्णी लावण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने तीन धोरणात्मक समित्या तयार केल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आर्थिक समिती, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी धोरणात्मक मुद्यांवर चर्चेसाठी तीन स्वतंत्र समिती गठीत केल्या आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि दिग्विजय सिंह हे आर्थिक कार्य समितीचे सदस्य असतील. तर जयराम रमेश हे त्यांचे संयोजक असतील. परराष्ट्र व्यवहार समितीत आनंद शर्मा, शशी थरूर, सलमान खुर्शिद आणि सप्तगिरी उलाका यांचा समावेश करण्यात आला आहे. खुर्शिद हे या समितीचे संयोजक असतील. राष्ट्रीय सुरक्षा समितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, विन्सेंट एच. पाला आणि व्ही. वैथिलिंगम यांचा समावेश असल्याची माहिती पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘मी दुःखी’
काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून शंकाकुशंका घेतल्या जात आहेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी बिहारच्या निवडणुकीनंतर पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिल्यानंतर बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना पक्ष सोडण्याचा सल्ला दिला आहे. आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याच सहकाऱयांना (काँग्रेस नेत्यांना) सणसणीत चपराक दिली आहे. पक्ष कमकुवत केला म्हणून त्यांनी काँग्रेस नेत्यांनाच जबाबदार धरले असून पक्षातील नेत्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. काही वरि÷ नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे आपण दुःखी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस अध्यक्ष निवड डिजिटल पद्धतीने?
काँग्रेस पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागल्यामुळे आता पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून डिजिटल पद्धतीनेच पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचा अध्यक्ष डिजिटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्यानंतर प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेने त्यासाठी यादीही तयार केली आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाटय़मय वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.