सतरावरुन पोहोचले चारवर : काँग्रेस पक्ष झाला खिळखिळा.जनतेचा विश्वास उडण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हे 32 वर्षे काँग्रेस पक्षात राहून पक्षाची व गोव्याची सेवा बजावणारे, कोणतेही कारण नसताना आमदारकीचा राजीनामा देणारे 2017 पासूनच्या या कालावधीतील ते चौथे आमदार ठरले आहेत. गोवा प्रदेश काँग्रेसचा त्याग करणारे ते 14 वे आमदार ठरले असून विधानसभेत काँग्रेसची सदस्य संख्या 17 वरून घसरत जाऊन ती आता केवळ 4 वर येऊन ठेपली आहे. 2001 मध्ये काँग्रेसची हिच स्थिती गोव्यात होती.
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन पोहोचेल्या असताना लुईझिन फालेरोसारख्या ज्येष्ठ नेत्याने कोणतेही कारण नसताना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने विरोधी पक्षामध्ये पुन्हा एकदा फुट पडलेली आहे. लुईझिन फालेरो यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते ऍड. यतिश नाईक, विजय पै यांच्यासह काही जणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लुईझिन फालेरो सारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसचे या निवडणुकीत खूप काही कमविण्याचे स्वप्न दुभंगलेले आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष गोव्यात अस्तित्वासाठी संघर्ष करील, या भाजपच्या नेत्याचे म्हणणे खरे ठरले आहे. आता आलेक्स रेजिनाल्ड हे देखील काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याच्याच स्थितीत आहेत.
काँग्रेसची वाताहत… 17 वरून केवळ 4 वर!
सत्तेत येण्याचे स्वप्न काँग्रेस नेत्यांचे होते, परंतु ते 2017 मध्ये दुभंगले. कारण लुईझिनना बाजूला ठेवण्यात आले. त्यांनीच कष्ट करून संपूर्ण गोव्यात सर्वत्र फिल्डिंग लावून काँग्रेस पक्षाला 17 पर्यंत मजल गाठता आली होती. एवढे झाल्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविण्यात अडथळे आणले. तिथून काँग्रेसला उतरती कळा सुरू झाली. आणखी 4 आमदार मिळाले तर काँग्रेस पक्ष सत्तेवर पोहोचतो, अशी अवस्था होती. 3 अपक्ष आणि चर्चिल आलेमाव हे एकत्र आले असते तरीही काँग्रेसला सरकार स्थापन करता येऊ शकले असते. परंतु लुईझिन फालेरो यांच्या विरोधात त्यावेळी काँग्रेसमधील नेत्यांनी कट रचला, आणि सारी गेम काँग्रेसच्या विरोधात गेली.
विश्वजित राणेंचा धक्कादायक निर्णय
काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणारे विश्वजित राणे हे पहिले आमदार ठरले आणि त्यांनी देखील गोवा विधानसभेत रेकॉर्ड केला. आमदारकीच्या सदस्यत्वाची शपथ राज्य विधानसभेत घेतली आणि तास दीड तासात काँग्रेस पक्षाविरुद्ध बंडच पुकारले आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.
शिरोडकर, सोपटे यांचाही राजीनामा
या घटनेनंतर शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी 2008 मध्ये आमदारकीचे राजीनामे दिले.
तब्बल दहा आमदार भाजपमध्ये
2019 मध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यातून काँग्रेसची वाताहत लागली आणि आता काँग्रेसची विधिमंडळात सदस्य संख्या केवळ 4 पर्यंत राहिली. 13 जणांनी आतापर्यंत काँग्रेसचा त्याग केलेला आहे.
बहुमत असूनही काँग्रेस सरकार गेले
साल 1999 च्या गोव्यातील मध्यावधी निवडणुकीत लुईझिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 21 जणांचे पूर्ण बहुमताचे संख्याबळ प्राप्त करून काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता. परंतु काठावरचे बहुमत हे लक्षात घेऊन इतर पक्षांच्या आमदारांना काँग्रेसमध्ये घेऊन संख्याबळ 26 पर्यंत नेले. परंतु तृतीय स्थानी असलेल्या फ्रान्सिस सार्दिन यांनी 11 आमदारांना घेऊन काँग्रेस पक्षात फुट पाडली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षात आणखी एक मोठी फुट तत्कालीन विरोधी पक्षनेते रवी नाईक यांनी निर्माण करून 7 आमदारांना घेऊन ते भाजपमध्ये गेले आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर वारंवार काँग्रेस पक्षात फुट पडत राहिली. अखेरीस काँग्रेसकडे लुईझिन फालेरो, प्रतापसिंह राणे, निर्मला सावंत, आणि आणखी एक असे मिळून केवळ 4 आमदारच शिल्लक राहिले होते.
त्यानंतर सार्दिन बरोबर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एकेकाला काँग्रेस पक्षात घेऊन पुन्हा काँग्रेस मजबूत होऊ लागली. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था ही अत्यंत बिकट बनलेली आहे. जनतेच्या या प्रमुख विरोधी पक्षावरचा विश्वासच उडून जाण्याची शक्यता आहे.