मिकी पाशेको यांनी दिला सल्ला
प्रतिनिधी /मडगाव
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे युती करण्यासाठी काही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्या पक्षांना काल रविवारी नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी सल्ला देताना ‘युतीची भाषा बोलणाऱयांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करावा. यापूर्वी या राजकीय पक्षांनी काय केलेय, हे गोव्यातील जनता विसलेली नाही’, असे म्हटले आहे.
गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी काँग्रेस पक्षाकडे युती करून निवडणूक लढवावी अशी भाषा सद्या गोव्यात सुरू झालेली आहे. गोवा फॉरवर्डने तर युतीसाठी काँग्रेस पक्षाला मुदत देखील दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मिकी पाशेको यांनी युतीची भाषा बोलणाऱयांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करावा, असे म्हटले आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे युती केली व सत्ता मिळविली. त्यानंतर पालिकेत जे काही राजकारण झालेय, त्याची जाणीव सर्वांना आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसला युतीची गरज नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले असते. मात्र, ऐनवेळी कोणी काँग्रेस पक्षाला फटका दिला हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे आत्ता काँग्रेस पक्षाला युतीची गरज नाही. ज्यांना कुणाला युती हवी असेल त्यांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करून काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे मिकी म्हणाले.
2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्यासाठी भाजपला पाठिंबा दिला अशी भाषा आज वापरली जाते, आत्ता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विरोध केला जातो, 2022 मध्ये जर अन्य कुणी मुख्यमंत्री होत असल्यास त्याला हय़ाच व्यक्ती पाठिंबा देणार नाही कशावरून? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. घोडे बाजाराला पुन्हा वाव ठेवायचा नाही असे हे ते म्हणाले.
आपले राजकारण आता सुरू…
मिकी पाशेको यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मिकी यांनी स्थानिक पातळीवरून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी कोणतीच खटपट न करता थेट दिल्लीत संपर्क साधून काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. पुढील दोन दिवसात आपण दिल्लीत जाऊन त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण आता कुठेही जाणार नाही. आपले राजकारण आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षात आपल्याला महत्वाची जबाबदारी मिळू शकते असे संकेत त्यांनी दिले. गोव्यातील जनता आपले स्वागत करतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
आजची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाला राज्यात सरकार स्थापन करणे कठीण आहे. लोकांना पूर्ण कल्पना आहे की, आगामी काळात कोणता पक्ष त्यांच्यासाठी योगदान देऊ शकेल. निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपले पूर्ण योगदान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाचे दहा आमदार गेले, त्यांना रोखण्यासाठी किंवा एकत्र ठेवण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आपण जर आमदार असतो तर या दहा आमदारांची नखे छाटली असती. या दहा आमदारांनी जनतेला सुद्धा ग्राहय़ धरलेय. मात्र, आत्ता जनताच त्यांना योग्य ते उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.