प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसचे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा बेळगाव दक्षिण मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला. खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी धामणे येथे महिलांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून मोठय़ा प्रमाणात दरवाढ केली आहे. सिलिंडरचे दर वाढल्याने महिलांना पुन्हा एकदा चुलीकडे वळावे लागले आहे. खाद्य तेलाचे दर वाढल्याने महिलांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी यांनाच विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी या परिसरात झंझावाती प्रचार केला. सतीश जारकीहोळी यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आजवरचे राजकारण, समाजकारण केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीची बेळगावला गरज आहे. भाजप सरकारने केलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून आपला असंतोष दाखवून द्या, असे त्यांनी सांगितले. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून आपला प्रचार सुरू ठेवला होता. काँग्रेसचे अनेक वरिष्ट नेते ठिकठिकाणी सभा घेऊन प्रचार करताना दिसून आले. बेळगाव शहर व तालुक्मयासोबतच सौंदत्ती, बैलहोंगल, अरभावी यासह इतर मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.