एखादी संघटना किंवा पक्षाने 136 वर्षांचा पल्ला गाठणे ही महत्त्वाची घटना आहे. काँग्रेसने आज 137 व्या वर्षात पदार्पण केले आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेसचा सहभाग मोठा होता. पण स्वातंत्र्य मिळवणे हे या संघटनेचे लक्ष्य होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसचे विसर्जन अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसला असलेले संघटनात्मक रुप बदलून त्याचे पक्षात रुपांतर करण्यात आले. महात्मा गांधीजी, पं. जवाहरलाल नेहरू आणि इतरही अनेक मान्यवर, विद्वान नेत्यांमुळे काँग्रेसला पर्यायच नव्हता. भारत देशाच्या उभारणीत काँग्रेसचा वाटा मोठा आहे, हे मान्य करतानाच, त्या पक्षाला सक्षम पर्यायदेखील नव्हता हेही ध्यानात घ्यावे लागेल. या पक्षाच्या 136 वर्षांच्या वाटचालीचा इतिहास हा कमी-अधिक या देशाचाच इतिहास आहे. या कालावधीत नेत्यांच्या चार पिढय़ा बदलल्या. प्रत्येक बदलत्या पिढीबरोबर उत्कर्ष आणि ऱहासाचा तराजू खाली-वर होत राहिला. थिऑसॉफिकल सोसायटीचे प्रमुख सदस्य असलेल्या ऍलेक ह्युम यांनी काँग्रेसची स्थापना केली, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी काँग्रेसला स्वातंत्र्यलढय़ाची दिशा दिली. लोकमान्यांचे द्रष्टेपण अद्वितीय होते. त्यामुळे देशभरातून प्रतिसाद मिळत गेला. लोकमान्य टिळकांनी रचलेल्या पायावर महात्मा गांधी आणि अन्य नेत्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे कळसारोहण केले. हा झाला इतिहास. काँग्रेसचे खरे मूल्यमापन करायचे असेल तर या पक्षाने सत्ता ग्रहण केल्यानंतर देशाच्या विकासाला कशी दिशा दिली, राजकारणाचे म्हणजेच सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचे कोणते डावपेच केले, घराणेशाही कशी राबवली आणि रुजवली ते नीट पाहणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारताची प्रगती आणि विकास कसा साधायचा याचा योग्य आराखडा पं. नेहरूंकडे होता. कृषीविकास, पाणी आणि उद्योगाबरोबरच शिक्षणाचे वारे देशात चांगल्या पद्धतीने कसे वाहते राहिल, याची दक्षता त्यांनी घेतली. असे असले तरी अठरापगड जाती, अनेक भाषिक राज्ये आणि नानाविध संस्कृतीचा संकर असलेल्या या देशाचे एकजिनसीकरण करणे सोपे नव्हते. अंधश्रद्धेच्या खाईतील देशबांधवांमध्ये एकात्मता साधण्यासाठी प्रयत्नांची गरज होती. काँग्रेसच्या आरंभीच्या वर्षांत द्रष्टय़ा नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. राममनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी काँग्रेस नेस्तनाबूत करण्यासाठी कंबर कसली. पण किरकोळ यशापलीकडे त्यांची गाडी सरकली नाही. लोहियांना मानणारा वर्ग कालांतराने संपुष्टात आला. काँग्रेसमध्ये पंडित नेहरूंनंतर राजीव गांधी, सोनिया गांधी यांचीच चलती राहिली आहे. सत्तेची चटक वाईट असते. ‘राजकारण हाच पेशा, त्यातूनच कुटुंबाची समृद्धी’ ही वृत्ती बळावत गेली. त्याग वर्तनात असण्याऐवजी, पुस्तकात राहिला. पक्षातील सज्जन, त्यागी माणसे मागे पडत गेली. सत्ताकारणात उपयोगी पडणाऱयांची चलती झाली. काँग्रेसमध्ये घराणेशाही प्रबळ आहे. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा,’ असे म्हणण्यापर्यंत वैचारिक अधःपतन होत गेले. इतिहासात या देशावर कित्येक वर्षांपासून वेगवेगळय़ा राजवटी होत्या. विविध राजांनी इथे राज्य केले, त्यामुळे घराणेशाहीबद्दल कुणालाही वावगे वाटत नव्हते. विरोधकांचा आवाज क्षीण करण्यात इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या होत्या. जयप्रकाश नारायणांचा वैचारिक विरोध त्यांनी सहजच चिरडून टाकला. या देशाच्या इतिहासातील आणीबाणीचा काळा कालखंडही इंदिरा गांधी यांनी लिहिला, तशी दहशतवादाला तोडीस तोड उत्तर देण्याची धमकही त्यांनी दाखवली. त्याचे मोल त्यांना प्राणार्पण करून द्यावे लागले. त्यांच्यानंतर राजीव गांधींनी काँग्रेसची कमान सांभाळली. जगभरातील वातावरण आधुनिकतेच्या दिशेने चालले होते. संगणकीकरण करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला, आरंभी असलेला प्रखर विरोध मावळून पुढच्या टप्प्यात त्याचा भारतीयांना फायदाच झाला. राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली नसती तर कदाचित या पक्षाचे चित्र वेगळे राहिले असते. 1990 नंतर, विशेषतः राजीवजींच्या पश्चात काँग्रेसमधील अनेक लोभी नेत्यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांनी पक्षाविरुद्ध कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने कारवाया सुरू केल्या. घराणेशाहीचा दंडक असल्यागत सोनिया गांधींकडे सूत्रे सोपवण्यात आली. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आडून त्यांनी सत्ता उपभोगली. काँग्रेस पक्ष मात्र अक्षरशः खिळखिळा झाला. सगळय़ाच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झाला, ते भरभराटीलाही आले. काँग्रेसमधल्याच नेत्यांनी या पक्षांना खतपाणी घातले. पक्षांतरे करून सत्तालालसा शमवण्याचा प्रयत्न केला. आता राहुल गांधी यांच्या ताब्यात पक्षाची सूत्रे आहेत. एकाच घराण्याकडे सत्ताकेंद्र राहिल्याने आज काँग्रेसची वाईट दशा झाली आहे. ती सुधारण्याची क्षमता असलेली मंडळी अन्य पक्षात जाऊन विविध पदे उपभोगत आहेत. राहूल गांधींना काँग्रेसमध्ये आज तरी पर्याय नाही. साहजिकच, या पक्षाला उभारी मिळेल, अशी स्थिती नजीकच्या भविष्यात नाही. अन्य पक्षांनी केलेल्या चुकांमुळे सत्तेत सहभाग मिळतो, हेही गणित काँग्रेसजनांना समजून चुकले आहे. संघटनात्मक बांधणी नीट झाली नाही तर हे ऱहासपर्व आणखी काही काळ असेच राहिल. काँग्रेस पक्षाने संपूर्ण बहुमताचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. अन्य पक्षांना सत्तेत सहभागी करून घेऊन सत्ता उपभोगली आहे. बाहेर राहून अन्य पक्षांना सत्ता स्थापन करण्यास संधी दिली आहे. त्यानंतर सत्ता मिळवण्यात पक्षाने यश मिळवले. हे करताना देशविकासाचा जाहीरनामा पक्षाजवळ होता. विद्यमान काळात पक्षात उरलेल्या सगळय़ा सदस्यांचा स्वविकासाचा ‘अजेंडा’ आहे. भारतीय जनता पक्ष या देशात प्रबळ होण्यासाठी काँग्रेसमधील सुंदोपसुंदीच कारणीभूत आहे. काँग्रेसच्याच नीतीचा अभ्यास करून, भाजप प्रबळ झाला आहे हेही सत्य आहे. आता भाजपची वाटचाल रोखण्यासाठी काँग्रेसकडे बळ उरलेले नाही, अशी स्थिती आहे. काँग्रेसची प्रतिमा सुधारण्यासाठी तेवढय़ा उंचीचे नेतृत्व हवे आहे. भारतासारख्या देशावर सत्ता गाजवायची असेल तर बहुमताची गरज आहेच, पण पक्षाच्या आंतरराष्ट्रीय नीतीलाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कमकुवत नेतृत्वाचा पक्ष देशावर राज्य करत असल्याचे लक्षात आले तर पाकिस्तान, चीनसारख्या देशांची धिटाई आणखी वाढू शकते. काँग्रेस बलशाली होणे हे त्या पक्षासाठी जसे आवश्यक आहे, तसेच या देशातील लोकशाहीसाठीही गरजेचे आहे, इतकेच.
Previous Articleउद्योगपती प्रकाश घोडके यांच्यासह भगिनी राजमती यांचे अपघाती निधन
Next Article नववर्षारंभी मिळणार ‘किसान सन्मान’चा हप्ता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.