भाजपाचे जयकुमार गोरे यांचा दावा
प्रतिनिधी/ सातारा
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे अनेक काँग्रेसवासी भाजपामध्ये प्रवेश करु लागले आहेत. सातारा जिह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने भाजपामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि. 11 रोजी प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, त्यांनी सातारा जिह्यात आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष हा हाताच्या बोटावर मोजण्याऐवजा शिल्लक राहील असेही भाकित त्यांनी केले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, जयकुमार शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 11 रोजी सातारा जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. सकाळी सातारा शहरातून दुचाकीची रॅली काढून त्यांचे स्वागत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात भव्य मेळावा होणार आहे. जिह्यात उंब्रज, कोळकी आणि कराड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी उशिरा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आटोपून ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत, असे सांगत जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिह्यात भाजपा हा 1 नंबरचा पक्ष बनतो आहे. येवू घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत चमक दाखवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिह्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिल, असे भाकित त्पंनी केले.
महिलांबाबत बोलताना भान राखले पाहिजे
भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडो करु लागले आहेत. त्याचा प्रत्यय उद्या अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, असाही दावा करत आमदार जयकुमार गोरे म्हणाले, सध्याच्या राजकारणावर बोलताना महिलांबाबत बोलताना नक्कीच भान राखले पाहिजे. तसेच सत्तार सोहबांचा निषेध करतानाही समोरच्या पक्षांनीही काही बंधने पाळली पाहिजेत. त्यांनीही आचारसंहिता पाळली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच संजय राऊत प्रकरणावरुनही त्यांनी महाविकास आघडीवर टीप्पणी केली. पुढे त्यांनी गद्दारी सर्वात प्रथम शिवसेनेने केली. उद्धव ठाकरे यांनी केली, असेही त्यांनी सांगितले.