आपचा लढा आता केवळ भाजपशीः वाल्मिकी नाईक
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात काँग्रेसचे पानीपत झाल्यात जमा असून आपचा लढा आता केवळ भाजपशी असल्याचे आप नेते ऍड. वाल्मिकी नाईक यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये आता चोडणकरांसह किरकोळ नेतेच शिल्लक राहिले आहेत. त्यातीलही दोघांचे सुपूत्र पूर्णवेळ भाजपात आहेत. अशावेळी काँग्रेसला घाबरण्याचे कारण राहिलेले नाही. आमचा लढा केवळ भाजपशी असेल, असेही ते पुढे म्हणाले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांचीही उपस्थिती होती. काँग्रेस नेते स्वार्थी आणि मतलबी असून केवळ फायद्यासाठी काँग्रेसमध्ये होते, असे नाईक म्हणाले. काँग्रेस केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातूनच संपत असून गोव्यात आणि ईशान्येकडील राज्यात काँग्रेसी नेत्यांची झालेली विक्री सर्वांनी पाहिली आहे. पंजाबमध्ये अन्य नेत्यांच्या अहंकारावर मात करण्यासाठी पॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या बदली नंतर प्रदेश प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनीही राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळवूनही काँग्रेसने आपले आमदार भाजपला विकले, असे पुढे बोलतना नाईक यांनी सांगितले.
एकीकडे अन्य पक्ष आमदारांची घाऊक विक्री आणि खरेदी करत आहेत. युवा वर्ग बेरोजगारीच्या खाईत ढकलला जात आहे, सर्व पक्षात अंतर्गत कलह आहे, तर दुसरीकडे दिल्लीत केजरीवाल सरकारने जागतिक दर्जाच्या शाळा, रुग्णालये बांधली, पाणी व वीज मोफत केली आहे, जनतेला अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, असे नाईक यांनी सांगितले.
महामारीच्या काळात ऑक्सिमीटर सेवेद्वारे आप घरोघरी पोहोचला. त्याशिवाय ऑक्सिजन चाचणी केंद्रांसह लोकांना मदत केली. आपच्या स्वयंसेवकांनी गोमंतकीयांना वैद्यकीय सेवेपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत सर्व काही मिळविण्यासाठी अहोरात्र काम केले.
फालेरोंकडून सर्वांचाच विश्वासघात
आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल गोव्यातील नागरिकांनी प्रेम दाखवले आहे. वीज आंदोलनात राज्यातील 2.93 लाख कुटुंबांनी केजरीवाल यांच्या 300 युनिट मोफत विजेच्या हमीसाठी पाठिंबा दर्शवला आहे. याच दरम्यान केजरीवाल यांनी अलीकडेच केलेल्या 80 टक्के नोकऱया आरक्षण हमीचीही राज्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. याऊलट काँग्रेसला जनतेची अजिबात पर्वा नाही. त्यांचे नेते केवळ वैयक्तिक फायद्यासाठी वावरत आहेत. म्हणुनच निवडणुकीला अवघे दिवस असताना फालेरो यांनी राजीनामा देऊन देशाचा, राज्याचा, काँग्रेसचा आणि स्वतःच्या मतदारांचाही विश्वासघात केला, असे नाईक म्हणाले.
आता काँग्रेस पूर्णतः कोलमडला : कुतिन्हो
गेल्या काही दिवसांपासून आम्ही जेथे गेलो तेथे नावेलीतील लोकांनी आप वर विश्वास व्यक्त केला. भाजप आणि काँग्रेसने सदैव मतदारांना गृहित धरले, त्यांचा विश्वासघात केला. फालेरोंच्या जाण्याने आज आम्ही काँग्रेसच्या घाऊक विक्रीचे आणखी एक उदाहरण पाहिले. आता काँग्रेस पूर्णतः कोलमडला आहे, अशी टीका प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.