प्रियांका गांधी यांचे आवाहन भाजपवर केली सडकून टीका
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील जनतेने भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारात अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. आत्ता जनतेची सहनशीलता संपली आहे. गोव्यातील लोक बदलासाठी सज्ज झाले आहेत. हा बदल घडवून आणताना गोव्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. यातच गोव्याचे भवितव्य आहे, असे उद्गार काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी काढले.
नुवे, माजोर्डा व नावेली येथे काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. नुवे येथील सभेत त्यांनी गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या सभांतून त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारने जनतेला लुटले असून केवळ सत्तेसाठी ते धडपड करीत आहेत. भाजप सरकारची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्यांत त्यांनी नोकऱया विकल्या आहेत. गोवा ही त्याला अपवाद नव्हता, असे त्या म्हणाल्या.
या सभेच्या व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोव्याचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, नुवेचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोविड काळात कामगारवर्गावर परिणाम
गोवा राज्य हे नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. तरीही या ठिकाणी बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी वाढण्यास भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली. कोविड काळात लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यामुळे अनेक मध्यम व लघु उद्योग बंद पडले. त्याचा परिणाम कामगारवर्गावर झालेला आहे. कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले. मध्यम व लघु उद्योग बंद पडल्याने आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला. कोविडच्या काळात रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. त्यामुळे अनेकांचे बळी गेल्याची टीका यावेळी करण्यात आली.
आप, तृणमूल काँग्रेस खोटारडे पक्ष
गोव्यातील जनतेने नेहमीच काँगेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. आत्ता या ठिकाणी आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेस हे दोन पक्ष आले आहेत. ते लोकांना खोटी आश्वासने देत असून त्यांना बळी पडू नये. भाजप सरकारने रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केवळ कोळसा वाहतूक करण्यासाठी केले आहे. त्याचबरोबर जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली. वीज बिलात वाढ केली. सरकारी नोकऱयांचा धंदा केल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.
पक्ष बदलूना पक्षात स्थान नाही
काँग्रेस पक्षाने यावेळी पक्ष बदलूना उमेदवारी दिलेली नाही. ज्यांनी पक्षांतर केले ते पुन्हा उमेदवारी मागत होते. मात्र, काँग्रेस पक्षाने आपल्या भूमिकेत कोणताच बदल केला नाही. आज पक्षाने नव्या चेहऱयांना संधी दिली असून जनता काँग्रेसच्या उमेदवारांना साथ देणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
गोव्यातील जनता यावेळी भाजपचा पराभव करणार असल्याचा विश्वास यावेळी पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. 2017 च्या निवडणुकीत जनतेने भाजपने कौल दिला नव्हता. तरी सुद्धा या ठिकाणी सरकार स्थापन केले व या सरकारचे कारनामे जनतेने पाहिले आहे. जनता या सरकारला कंटाळली असून यावेळी बदलासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
नुवेचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांनी माजी आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांनी शेतकऱयांच्या नावाने जी सबसिडी घेतली होती, तिचे काय झाले याचे उत्तर जनतेला द्यावे असे जाहीर आव्हान दिले. नुवेच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगणाऱया आमदाराने किती विकासकामे केली याची माहिती जनतेला द्यावी. जर विकासकामे झाली होती तर भाजपने का उमेदवारी दिली नाही याचे उत्तरही द्यावे असे जाहीर आव्हान दिले.