संपूर्ण राज्यात रयत जागृती अभियान राबविणार
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱयांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. भूसुधारणा व एपीएमसी दुरुस्ती विधेयकांना दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली आहे. काँग्रेस मात्र या संदर्भात चुकीची माहिती देण्याचे सत्र हाती घेतले आहे. काँग्रेसने सुरु केलेल्या अपप्रचाराविरुध्द संपूर्ण राज्यात रयत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
भाजप रयत मोर्चाचे राज्याध्यक्ष खासदार ईरण्णा कडाडी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष लोकेशगौडा, दुंडाप्पाण्णा बेंडवाड, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, राजू चिक्कनगौडर आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगावसह सर्व जिह्यात रयत जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी 15 लाख पत्रके वाटण्यात येणार आहेत. अमेजान, फ्लिपकार्डसारख्या कंपन्या कोटय़ावधी रुपयांच्या वस्तु विकू शकतात तर शेतकरी आपण पिकविलेला माल का विकू शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ट्रक्टर व शेती अवजारांची आम्ही शेतकरी पूजन करतो. काँग्रेसच्या आंदोलनात मात्र ट्रक्टर जाळण्याचे प्रकार घडले आहेत. रयत जागृती अभियानात ट्रक्टर, शेती अवजारांबरोबरच गो मातेचे पूजन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारने केलेले कायदे शेतकऱयांच्या हिताचे आहेत. हे शेतकऱयांना ठासून सांगण्यात येणार आहे, असेही ईराण्णा कडाडी यांनी सांगितले.
केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी हे मंगळवारी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. दुपारी 12 वाजता त्यांच्या सोबत बैठक होणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील बेळगाव दौऱयावर येणार आहेत. चिकोडी व बेळगाव येथील पदाधिकाऱयांशी ते चर्चा करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.