कोल्हापूर प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील 25 आमदारांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्रात ज्या आमदारांची नावे आहेत, त्यातील बहुतांश काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात आणि सद्यःस्थितीत ते नाराज असल्याचेही बोलले जाते. त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल चालले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. दरम्यान, या आमदारांच्या यादीत कोल्हापूर जिल्हय़ातील पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हय़ातील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
पत्राची माहिती बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी उघड
काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते असलेल्या अनंतराव थोपटे यांचे पुत्र असणारे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या लेटरहेडच्या माध्यमातून पत्र लिहून अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती देण्यासाठी काँगेसच्या आमदारांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटणार आहे. त्यासाठी आपण 4 किंवा 5 एप्रिलला भेटीसाठी वेळ द्यावी, अशी विनंती केली होती. हे पत्राची माहिती बाहेर आल्यानंतर राज्यातील काँग्रेस आमदारांमध्ये असणारी नाराजीही पुढे आली. मात्र थोपटे यांनी नंतर आम्ही नाराज नाही तर दिल्लीला टेनिंगसाठी जाणार असल्याचे सांगत सारवा – सारव करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर फारशी प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही.
काँग्रेसच्या निष्ठावंतांमधील खदखद उघड
राज्यातील काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, कै. विलासराव देशमुख या बडय़ा नेत्यांचे गट आहेत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. त्याबरोबर इतरही काँग्रेसनिष्ठ घराणी आहेत. त्यामध्ये पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे यांच्या घराण्यांचा समावेश आहे. पी. एन. पाटील हे काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा कोल्हापुरात भव्य पुतळा आणि त्यांच्या नावाने अखंडीत सद्भभावना दौड, शेतकरी मेळावा आयोजनाचे श्रेयही पी. एन. पाटील यांना जाते. कठिण काळात काँग्रेसची राज्यात पडझड होत असताना पी. एन. पाटील यांनी जिल्हय़ात काँग्रेस एकत्रित ठेवण्यासाठी खिंड लढविली होती. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही ज्येष्ठ, पक्षनिष्ठ काँग्रेस आमदारांना महत्वाची पदे अथवा मंत्रीपदे मिळाली नाहीत. त्यामध्ये पी. एन. पाटीलही आहेत. त्याचबरोबर सत्तेवर येऊन सव्वा दोन वर्षे झाली तरी महाविकास आघाडी सरकारने महत्वाची महामंडळे, समित्या यावरील सदस्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इतर घटक पक्षांप्रमाणे काँग्रेस आमदारांतही नाराजी आहे. ती नाराजी सोनिया गांधी यांची भेट घेण्याच्या निमित्ताने पुढे आली आहे.
देशमुख गट आणि पी. एन. पाटील
एकेकाळी प्रदेश काँग्रेसवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वर्चस्व होते. पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे वडील माजी खासदार जयवंतराव आवळे हे देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. आवळे यांना तर देशमुख यांनी लातूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण देशमुख यांच्या अकाली निधनाने पाटील, आवळेंचा भक्कम राजकीय आधार गेला. पी. एन. पाटील यांच्या नाराजी मागे जिल्हा काँग्रेसमधील गट आणि राजकारणाचेही काही कंगोरे आहेत.
सोनियांना पाठविलेल्या पत्रात नावे असलेले आमदार
संग्राम थोपटे, विकास ठाकरे प्रणिती शिंदे, संजय जगताप, कुणाल पाटील, अमित झनक, पी. एन. पाटील, हिरामण खोसकर, आमीन पटेल, विक्रमसिंह सावंत, सासाराम कोराटे, बळवंत वानखेडे, लहू कानडे, शिरीष चौधरी, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, शिरीष कुमार नाईक, कैलास गोरंटय़ाल, राजेश ऐकाडे, सुलभा खोडके, सुभाष धोटे आणि राजूबाबा आवळे.