बीना नाईक यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
सांखळी येथे काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेदरम्यान सरकारने व प्रामुख्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस दलाचा गैरवापर केला असून पोलिसांची कृती आक्षेपार्ह असल्याची टीका गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी केली आणि तेथील घटनेचा निषेध नोंदवला. सरकारने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी नाहीतर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी हिन वागणूक दिली. आंदोलनातील महिलांना कशी वागणूक द्यायची त्यांना कसे रोखायचे याबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी प्रकट केले. पोलिसांनी फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवले कारवाई केली परंतु आयत्यावेळी आलेल्या जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी हातही लावला नाही. पोलिस दलाने हा पक्षपातीपणा केला असून भाजप कार्यकर्त्यांमुळेच तणाव झाला. काँग्रेसने कोणताही तणाव केला नाही असे नाईक यांनी ठामपणे सांगितले.
पोलिसांची सदर कृती संशयास्पद-चुकीची असून त्याबाबत पोलिस महासंचालकांना निवेदन देणार असल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बघून डॉ. सावंत घाबरले म्हणूनच त्यांनी पोलिस-कार्यकर्ते फौजफाटा आणला असा आरोप नाईक यांनी केला.