देवेंद्र फडणवीस यांची टीका : सावंतवाडीला धावती भेट
वार्ताहर / सावंतवाडी:
काँग्रेसच्या काळातच मोठय़ा प्रमाणात ईडीचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आपला काळ आठवावा. जर तुम्ही काही केलेच नाही तर घाबरता कशाला? काही केले असेल तर कारवाई होईलच, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. कोकणातील शेतकऱयांवर ओढवलेल्या शेती हानीबाबत उद्धव ठाकरे सरकारने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. एक पैशाची भरपाईही या सरकारने दिली नाही. फक्त घोषणा केल्या, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
फडणवीस कोल्हापूरहून गोव्यात जात असताना सावंतवाडीत त्यांचे भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, मोहिनी मडगावकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, ऍड. परिमल नाईक, समृध्दी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, परिणीती वर्तक, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, हेमंत बांदेकर, केतन आजगावकर, गुरू सावंत, गुरू मठकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, तुम्ही घोटाळे केले नसतील तर घाबरण्याचे काही कारण नाही. काँग्रेसच्या काळातच ईडीचा गैरवापर केला गेला. कोणी घोटाळे केले असतील तर ते उघड होतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल. जर तुम्ही घोटाळेच केले नसतील तर घाबरण्याची आवश्यकता नाही.
ते पुढे म्हणाले, कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. त्याची आपण पाहणी केली आहे. ठाकरे सरकारने शेतकऱयांना भरपाई देण्याची घोषणा केली, ती हवेतच विरली आहे.
फडणवीस यांचे सावंतवाडीत भाजपच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी एक तास हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. त्यानंतर ते गोव्याला रवाना झाले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार नीतेश राणे उपस्थित होते. त्यांनी पालिकेतही भेट दिली. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी चर्चा केली.