मुंबई/प्रतिनिधी
शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. पण काँग्रेसमध्ये असताना अनेक पदे भोगलेले शरद पवार गेले काही दिवसांपासून काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा शरद पवारांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच अवस्था आज काँग्रेसची आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुकवारी व्यक्त केले. एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र; तसेच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. तर, काँग्रेसकडून देखील शरद पवारांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.
“त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.” असं नाना पटोले एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
तसेच, “सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. त्यामुळे देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल.” असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.