मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. दरम्यान यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे.
रामदास आठवले यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकासआघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा.” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.
आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार, असं नाना पटोले म्हणालेले आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल, तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.