ऑनलाईन टीम / गांधीनगर :
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसने सावधगिरी बाळगत 65 आमदारांना तीन रिसॉर्टमध्ये ठेवले आहे.
गुजरातमध्ये 19 जुलैला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच गुरुवारी अक्षय पटेल व जितू चौधरी यांनी तर शुक्रवारी ब्रिजेश मेरजा या आमदारांनी राजीनामा दिला. मार्चपासून गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरू असून आतापर्यंत 8 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 65 वर आले आहे.
आठ आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी फुटाफूट होऊ नये म्हणून शनिवारी उत्तर गुजरातमधील काही काँग्रेस आमदारांना बनासकाठा जिल्ह्यातील अंबाजीजवळील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले, तर दक्षिण आणि मध्य गुजरातमधील आमदारांना आणंद येथे एका खासगी बंगल्यामध्ये नेण्यात आले आहे.
राज्यसभेच्या 4 जागांसाठी भाजपचे 3 तर काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. संख्याबळ कमी झाले नसते तर भाजप आणि काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले असते. दोन जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते. मात्र, आता संख्याबळ कमी झाल्याने तिसरी जागाही भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यसभेच्या 4 जागांसाठी 5 जण रिंगणात आहेत. भाजपने अभय भारद्वाज, रमिला बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने शक्तींसिह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना रिंगणात उतरवले आहे.