ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत रविवारी झालेल्या रॅलीतील वादानंतर वांदे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत. झिशान यांनी 14 नोव्हेंबरला काढण्यात आलेल्या रॅलीचा संदर्भ देत जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधींना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
झिशान यांनी या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत 14 नोव्हेंबरला पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाई जगताप यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करत माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. तसेच धक्काबुक्की केली. यावेळी शेकडो लोकांसमोर माझा अपमान झाला. मात्र, पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मी त्यावेळी काहीच बोललो नाही. भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी झिशान यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे.
रविवारी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान सिद्दीकी यांना राजगृहात जायचे होते. मात्र, त्यांना जाऊ दिले नाही. त्यावेळी भाई जगताप आणि सिद्दीकी यांच्यात वाद झाला. त्यानंतर आत जाण्यासाठी केवळ 10 जणांनाच परवानगी असल्याचे स्पष्टीकरण जगताप यांच्याकडून देण्यात आले.