मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्तर भारतीय समाजाचे नेते म्हणून कृपाशंकर सिंह यांची ओळख होती. त्यांनी मुंबईत तसा दबदबा ठेवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.
मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेत कृपाशंकर सिंह यांनी केंद्र सरकारचं कौतुक केले होते. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कृपाशंकर सिंह यांनी १० सप्टेंबर २०१९ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून कृपाशंकर सिंह भाजपात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.