मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षाला विजयाची खात्री नाही तसेच स्वतःच्या उमेदवारांवर विश्वास नाही, अशी टीका करून काँग्रेस पक्षाने मतमोजणीपूर्वीच हार मान्य केल्याचा ठपका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवला आहे. लक्ष विचलित करण्यासाठीच काँग्रेस पक्ष नको ते विनाकारण आरोप करीत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्यांचे जर फोन टॅपिंग होत असेल तर त्यांनी डिजीपींकडे तक्रार करण्याची हिंमत दाखवावी. त्याची चौकशी करण्यात येईल, असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.
जनतेने दिलाय भाजपला कौल
जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला कौल दिला असून जनमत भाजपलाच मिळणार आहे आणि भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याची खात्री डॉ. सावंत यांनी वर्तविली आहे. भाजप किंवा सरकार कोणाचेही फोन टॅपिंग करीत नाही आणि ते करण्याची गरज नाही असेही डॉ. सावंत म्हणाले.
कर्नाटकचा म्हादई प्रकल्प होऊ देणार नाही
म्हादई नदीवर कर्नाटक राज्यात कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही. त्या संदर्भात केंद्र सरकारकडे हरकत व आक्षेप नोंदवला आहे. म्हादई नदीवरील प्रकल्पासाठी अहवाल तयार करण्यात आल्याचे कळते, परंतु त्या अहवालास केंद्र सरकार मान्यता देणार नाही. तसेच कर्नाटकाचा म्हादई नदीवर प्रकल्प साकार करण्याचा हेतू साध्य होणार नाही, असा विश्वास डॉ. सावंत यांनी वर्तविला आहे.