मुंबई/प्रतिनिधी
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. यावेळी ममता यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना यूपीए संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना ममता यांनी यूपीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. यांनतर देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली. दरम्यान, ममताच्या या वतव्यावर काँग्रेसने टीका केली होती. आता शिवसेनेनेही तिसऱ्या आघाडीसंदर्भात आक्षेप घेतला आहे.
ममताच्या मुंबई दौऱ्यानंतर देशात भाजपासमोर यूपीएशिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा ‘शुभारंभ’ झाल्याचं बोललं जात आहे. खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि पवारांसमोरच ममतादीदींनी “देशात यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेने मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील यूपीएचं समर्थन केलं आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर सेनेने आक्षेप घेतला आहे.
देशात यूपीएला वगळून दुसरी आघाडी उभी करणं म्हणजे भाजपाला आयती मदत करण्यासारखंच असल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. “मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कुणाकुणाला मान्य नाही, त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत. पडद्यामागून गुटरगूं करू नये”, असं शिवसेनेकडून सुनावण्यात आलं आहे.