ईडी-सीबीआयद्वारे चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसच्या 8 आमदारांना फोडण्यासाठी भाजपने प्रत्येकी रु. 30 ते 40 कोटी दिल्याचा आणि या प्रकरणात एकूण रु. 300 कोटीचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. एवढी रक्कम भाजपकडे कोठून आली? ईडी-सीबीआय यांनी याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपने त्या आमदारांना विकत घेतले आणि ते या मोठय़ा रक्कमेसाठी विकले गेल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे.
पणजीत काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, खासदार फ्रान्सिस सार्दिन व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी वरील गंभीर आरोप केला.
मतदार, पक्ष अन् देवांचाही विश्वासघात
मोठय़ा रक्कमेसह त्या फुटीरांना मंत्रिपदाची, महामंडळ अध्यक्षपदाची आश्वासने देण्यात आली असून केवळ पैसा आणि सत्तेसाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचा, मतदारांचा, देवाचा विश्वासघात केला आहे असे सांगून या कोटय़वधी रक्कमेचा पर्दाफाश करण्यासाठी ईडी-सीबीआय पुढे का येत नाहीत? अशी विचारणा काँग्रेसने केली. कारण त्या एजन्सी भाजपच्या हातातले बाहुले बनल्या आहेत. त्या फक्त विरोधकांच्या मागे लागतात. भाजपच्या एकाही नेत्याच्या मागे त्या का लागत नाहीत? याचे उत्तर देण्याची मागणी काँग्रेसने केली.
आमदार फुटले ही लोकशाहीची शोकांतिका
गुंडूराव म्हणाले की, भाजपकडे सरकारसाठी पुरेसे बहुमत होते. त्यांना आणखी आमदारांची गरज नव्हती तरीदेखील भाजपने सत्ता, पैसा व बळाचा वापर करुन काँग्रेस आमदारांना फोडले ही लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. कारण भाजपला काँग्रेस पक्ष नकोसा झालेला आहे आणि त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे. देशभर ही फोडाफोडीची मोहीम भाजपने सुरु केली असून काँग्रेसने मात्र भाजपमुक्त भारत असा विचारही कधी केला नव्हता व तशी कृतीही केली नाही, असे राव यांनी बोलून दाखवले.
काँग्रेस आमदारांनी देवळात, चर्चसमोर व इतर ठिकाणी शपथ घेतल्या आणि फुटणार नसल्याचे वचन दिले म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले. त्यांनी शेवटी जनतेचा विश्वासघात केला, असेही राव म्हणाले.
काँग्रेसच्या एका आमदाराला रु. 45 कोटी दिल्या : अमित पाटकर
भाजपने काँग्रेसच्या एका आमदारास फुटण्यासाठी रु. 30 कोटीचा प्रस्ताव दिला तो त्याने नाकारला तेव्हा रक्कम रु. 10 कोटीनी वाढवून रु. 40 कोटी करण्यात आली. तेव्हाही तो आमदार तयार झाला नाही म्हणून त्याची रक्कम रु. 5 कोटीनी वाढवून रु. 45 कोटी केली तेव्हा तो आमदार फुटण्यास तयार झाला असा गौफ्यस्फोट अमित पाटकर यांनी केला.
कोटय़वधी रक्कमेमुळेच ते आमदार फुटले ती रक्कम जर दिली नसती तर ते फुटलेच नसते, असे मत सार्दिन यांनी प्रकट केले. थोडक्यात सांगायचे तर काँगेसला संपविण्यासाठी त्यांना विकत घेण्यात आले, असे ते म्हणाले.