वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील काँग्रेसचे आमदार शर्मन अली अहमद यांना दारांग जिल्हय़ात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान ‘प्रक्षोभक’ टिप्पणी करण्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अहमद यांना शनिवारी दिसपूरमध्ये त्याच्या आमदार निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीसाठी पानबाजार पोलीस स्थानकात आणले गेले. तेथेच त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून रविवारी सांगण्यात आले.
भादंविचे कलम 124 अ (देशद्रोह) अंतर्ग त्यांच्याविरोधात एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑल आसाम स्टुडट्सं युनियन (आसू) आणि भाजयुमो समवेत अनेक संघटनांनी आमदाराच्या टिप्पणीवरून त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती.
तसेच आसाम काँग्रेसने राज्यात पोटनिवडणुकीपूर्वी ‘सांप्रदायिकदृष्टय़ा प्रक्षोभक’ विधान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. दारांग जिल्हय़ाच्या सिपाझार भागात अतिक्रमण करणाऱया लोकांनी आसाम आंदोलनाच्या दरम्यान 1983 मध्ये 8 लोकांची हत्या केली होती असा दावा भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीच्या काही नेत्यांनी केला होता. या दाव्यावर प्रतितिक्रया देताना अहमद यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती.
1983 च्या आंदोलनात मारले गेलेले 8 लोक ‘हुतात्मा नव्हे मारेकरी होते’ कारण ते सिपाझार भागाच्या अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना मारणाऱयांपैकी एक होते असे अहमद यांनी म्हटले होते.
8 जणांवर हल्ला या क्षेत्रातील मुस्लीम लोकसंख्येकडून स्वरंक्षणाकरता करण्यात आला होता असेही त्यांनी म्हटले होते. आसाम आंदोलनाच्या जुन्या घटनांच्या जखमांना उकरून काढत सांप्रदायिक स्वरुपात करण्यात आलेली प्रक्षोभक टिप्पणी असंवेदनील आणि अस्वीकारार्ह असल्याचे काँग्रेसने स्वतःच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.