प्रतिनिधी/ पणजी
गोवा विधानसभा निवडणूक रिंगणातील काँग्रेसच्या एकूण 36 उमेदवारांनी पणजीत एकत्र येऊन बैठक घेतली आणि राजकीय राणनितीची चर्चा केली. त्याचबरोबर राजधानीतील दैवत श्रीमहालक्ष्मी मंदिरात सर्वांनी एकसंघ राहून न फुटण्याची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसच्या विजयासाठी गाऱहाणे घोतले तसेच प्रार्थना केली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार फुटू नयेत आणि ते पक्षाशी एकनिष्ठ राहावेत म्हणून हा कार्यक्रम आखण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
याशिवाय सर्व 36 उमेदवारांनी बांबोळी येथील ‘फुलांचो खुरीस’ तसेच बेती येथील गुरुद्वारा येथे एकत्रित भेट देऊन काँग्रेस सरकार स्थापन व्हावे म्हणून हात जोडले. यावेळी काँग्रेसचे ज्ये÷ नेते आणि निवडणूक रणनितीकार पी. चिदंबरम, गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.
लोकांच्या समजाबाबत काँग्रेस गंभीर
दिगंबर कामत म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर ते इतर पक्षात जातात. या लोकांच्या समजाबाबत काँग्रेस अत्यंत गंभीर आहे. आम्ही याबाबत खूप गंभीर आहोत आणि कोणत्याही पक्षाला आमच्या आमदारांना विकत घ्यायला देणार नाही. देवावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे की आम्ही चुकणार नाही, असे कामत म्हणाले.
पक्षांतरास भाजपही तेवढाच जबाबदार
मागील पक्षांतरांना केवळ काँग्रेसच जबाबदार नाही, तर त्यांच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केलेला भाजपही तितकाच जबाबदार आहे. भाजपने त्यांना ऑफर दिली आणि म्हणून त्यांनी पक्ष बदलला. आम्ही गोव्यातील लोकांना खात्री देऊ इच्छितो की असे पुन्हा होणार नाही. राजकीय घाऊक खरेदी बंद व्हायला पाहिजे. यासाठी गोव्यातील लोकशाहीचा घात करणाऱया पक्षांतरांविरुद्ध आम्ही आक्रमकपणे काम करत आहोत, असे ते म्हणाले.