कोरोना महामारीने बाधित झाल्याने काँग्रेस उमेदवार रेजाउल हक यांचा निवडणुकीपूर्वीच कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी मृत्यू झाला आहे. ते मुर्शिदाबाद जिल्हय़ातील समशेरगंज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार होते. अलिकडेच समशेरगंज विधानसभा मतदारसंघावरून डावे पक्ष तसेच काँग्रेस यांच्यात वाद झाला होता. डाव्या पक्षांनी मोदस्सर हुसैन यांना या मतदारसंघातील उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने रेजाउल हक यांना मैदानात उतरविले आहे. पण काँग्रेस-डावे पक्ष यांच्यात आघाडी झाली असली तरीही दोघांमध्ये सहमती होऊ शकली नव्हती.
पक्ष उमेदवाराच्या मृत्यूवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी कोरोनावरून आयोग उदासीन असल्याचा आरोप केला आहे. मुर्शिदाबादमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. बंगालमध्ये मागील 24 तासांमध्ये उच्चांकी 5892 नवे रुग्ण सापडले आहेत. रेजाउल हक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती.
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यात 45 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचार आता संपुष्टात आला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता निवडणूक आयोगाने बंगालमधील सर्व राजकीय पक्षांची शुक्रवारी बैठक बोलाविली आहे. बंगाल निवडणुकीच्या उर्वरित 4 टप्प्यांच्या प्रचारादरम्यान कोविड-19 नियमांचे कठोरपणे पालन करविणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली आहे.
बैठकीत निवडणूक प्रचारावरून चर्चा केली जात आहे. निवडणूक प्रचार होत असलेल्या सभा तसेच रोड शोंमध्ये कोरोनासंबंधी आरोग्य दिशानिर्देशांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. बैठकीत सर्व राजकीय पक्षांना प्रचारासंबंधी आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत.