ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस आज सर्व राज्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करणार आहे. तसेच पक्षाचे राज्य युनिट गुरुवारी राजभवनाबाहेर निदर्शने करणार आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले, पेगाससच्या अहवालात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन हॅक झाल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर मोदी सरकारने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही हेरगिरी केली होती.
हेरगिरी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने इस्रायली एनएसओ कंपनीकडून पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस या प्रकरणावर देशभरात आवाज उठवणार असून, गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले.