काँग्रेसने तिकीटांची विक्री केल्याचा आरोप
खडूर साहिब लोकसभा मतदारसंघात 42 वर्षांनी काँग्रेसला विजय मिळवून देणारे खासदार जसबीर सिंह डिंपा यांचे बंधू राजन गिल यांनी अकाली दलात प्रवेश केला आहे. याकरता अकाली दल अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी अमृतसरे येथे जात राजन गिल यांना पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त केले आहे.
काँग्रेससाठी गिल यांचा अकाली दलातील प्रवेश हा अमृतसर तसेच तरनतारन दोन्ही भागांसाठी मोठा झटका आहे. काँग्रेस खासदाराच्या भावाने अकाली दलात प्रवेश केल्याने अमृतसरमधील खडूरसाहिब तसेच बाबा बकाला साहिब मतदारसंघात प्रभाव दिसून येणार आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारी विकल्याचा आरोप राजन यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि हरीश चौधरी यांनी पक्षाला पतनाच्या दिशेने ढकलले आहे. काँग्रेसची लढाई आता केवळ कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पक्षापुरतीच मर्यादित राहणार आहे. तर अकाली दलाच्या विचारसरणीशी मी सहमत आहे. आम आदमी पक्ष हा बाहेरचा आहे. कुटुंबाच्या सहमतीने अकाली दलात प्रवेश केल्याचे राजन यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेने जोर पकडला आहे.
काँग्रेस पूर्वीसारखा राहिलेला नाही
काँग्रेस आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. हे का घडतेय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा. जुने नेते पक्ष सोडत आहेत. सिद्धू सारखे पक्षांतर करून पोहोचलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. हरीश चौधरी राजस्थान सोडून पंजाबमध्ये बसले आहेत. सिद्धू देखील प्रत्येक गोष्टीवर पक्षनेतृत्वाला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा सुखबीर बादल यांनी केला आहे.
सिद्धू यांना भीती सतावतेय
विक्रम सिंह मजीठिया यांनी यादरम्यान नवज्योत सिंह सिद्धू यांचा मंत्र पठण करतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून निशाणा साधला आहे. सिद्धू यांना त्यांचा पराभव दिसू लागल्यानेच ते तंत्र-मंत्रच्या पाठी लागल्याचे मजीठिया म्हणाले.